रूळानुबंध
(पुस्तक परिचय)
मुखपृष्ठ
पुस्तकाचे शीर्षक - रूळानुबंध
लेखक - गणेश मनोहर कुलकर्णी
प्रकाशक - शब्दमल्हार प्रकाशन, नाशिक
तिसरी आवृत्ती - २७ फेब्रु २०२६
किंमत ३००/-
पृष्ठ संख्या १४६
लेखाचे, पुस्तकाचे शीर्षक वाचल्यावर बऱ्याच जणांना वाटेल टंकीत करतांना चूक झाली असावी. तसे वाटणे साहजिकच आहे. कारण हा शब्दच परिचयाचा नाही. उलटपक्षी ऋणानुबंध हा शब्द सर्व परिचित आहे म्हणण्यापेक्षा, या शब्दच्या आपण सारेच प्रेमात आहोत,
ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गांठी
भेटींत रुष्टता मोठी...
बाळ कोल्हटकरांचे गीत आणि पंडित कुमार गंधर्व- वाणी जयराम यांचे स्वर! मराठी मनात अगदी खोलवर रुतून बसलेले गीत. माझ्या तर फारच आवडीचे, खूप लहान असतांना पासून, म्हणजे अगदी त्यातील शब्दच काय आहे हे नीट कळत नसतं, त्याचे अर्थ समजणे वगैरे फार लांबची गोष्ट. असो.
तर पुस्तकाचे आणि लेखाचे शीर्षक अगदी अचूक टंकीत झालेले आहे. रूळ + अनुबंध = रुळानुबंध! अशी फोड केल्यावर साधारण शब्दचा अर्थ लक्षात येऊ शकतो. रूळ म्हणजे आगगाडीशी संबंधित काहीतरी असावे. आता आगगाडी शब्दच नाही, तर प्रत्यक्ष आगगाडी सुद्धा कालबाह्य झालेली आहे. तथापि त्याला पर्यायी शब्द अजून कुठे वाचण्यात आलेला नाही. मला रूळगाडी हा शब्द त्यातल्या त्यात सुचला आणि योग्य वाटतो. कारण आगगाडी प्रमाणे शब्दशः अर्थ विचारत घेऊन शब्द तयार केला तर तो वीजगाडी किंवा डीझेलगाडी असा शब्द वापरला तर हल्ली रस्त्यावर चालणाऱ्या चारचाकी सुद्धा वीज आणि डीझेल वर चालतात, त्यामुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो. तर अर्थातच हे पुस्तकं रूळगाड्यांशी संबंधित आहे.
रूळगाडी म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतो तो प्रवास, अर्थातच प्रवासी म्हणून. मग अगदी प्रवासाचे नियोजन पासून तो प्रवास संपवून घरी येई पर्यंतचे सारे चित्रं डोळ्यासमोर उभे राहते. अगदी आरक्षण मिळत नाही, ते मिळाले की ती गाडी किती उशिराने धावतेय?, फलाटावर गेल्यावर तिथली गर्दी, कोलाहल, प्रत्यक्ष गाडी आल्यावर, गाडीत चढल्यावर, आत गेल्यावर तिथली वेगवेगळी परिस्थिती, सहप्रवासी असे एक न अनेक प्रसंगांना आपण सामोरे जात असतो.
या पलीकडे जाऊन, माझ्यासारख्या वेड्या लोकांना एकदा तरी गाडीच्या इंजिन मध्ये, मालगाडीच्या शेवटच्या गार्डच्या डब्यात बसून प्रवास करण्याची संधी मिळावी असे वाटते. किंवा कधी तर या गाड्यांच्या चालकांचा किंवा गार्डचा हेवा वाटतो, त्यांना काही चिंता नाही, त्यांच्या शिवाय गाडी धावणारच नाही, त्यामुळे त्यांची गाडी चुकण्याची शक्यताच नाही, त्यांना आरक्षण मिळण्याची काही गरजच नाही, कारण त्यांचे कायमचे आरक्षण असतेच, त्यांची जागी कुणी बसतच नाही, त्यांना मस्त झेंडा दाखवता येतो(लहानपणा पासूनची इच्छा आहे माझी, एकदा तरी हा झेंडा हातात घेऊन तो दाखवता यावा), इंजिन चालकाला गाडी धावत असतांना मस्त आजूबाजूची छान छान दृश्य दिसत असतील, जी गाडीत, खिडकी मिळूनही आपल्याला दिसत नाही, वगैरे वगैरे.
तथापि हे पुस्तक वाचल्यावर वाटते, आपण प्रवासी म्हणून या गाड्यांतून प्रवास करतो, हे जास्त भाग्याचे आहे. कारण हे पुस्तक ज्यांनी लिहिले आहे, ते स्वतः या रूळगाडीचे चालक होते. सोबतीनेच ते अतिशय हळव्या मनाचे. त्यांनी आपले आयुष्यभरातील अनुभव या पुस्तकांत सांगितले आहे. खरतरं हे पुस्तक म्हणजे एक लेख मालिका आहे आणि ते सर्व लेख भानु काळे यांच्या 'अंतर्नाद' या मासिकांत छापून आलेले आहेत. अंतर्नाद हे एक अतिशय दर्जेदार मासिक होते. साहजिकच त्यातील साहित्यही सकसच! असे असूनही हे मासिक बंद पडले... आता पुन्हा सुरु झाले आहे, पण ई-पुस्तक स्वरूपांत. असो. थोडे विषयांतर झाले.
एकूण नऊ प्रकरणांत त्यांनी त्यांचे अनुभव चित्रित केलेले आहेत. यात त्यांनी काळानुसार अनुभव शब्दांकित केलेले नसून, त्यांनी त्याचे विषयवार लेखन केलेले आहेत. यातील प्रत्येक लेखांतील माहिती त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेली आहे, हा प्रत्येक लेख वाचकाला निरनिराळ्या पातळीवर चकित करतो, विचार करायला भाग पडतो. भारतासारख्या देशांत रूळगाडीचालक म्हणून त्यांना कुठे-कुठे, केव्हा-केव्हा, कसल्या-कसल्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. याचा त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर कसा आणि किती खोलवर परिमाण होतो, होऊ शकतो. व्यथित करणारे आहे सारे. आपण प्रत्येकाने रूळगाडीत प्रवास करतांना क्षणभर थांबून, मनातल्या-मनांत का होईना या रूळगाडी चालकांना शुभेच्छा द्यायला हव्यात, असे वाटले मला, हे पुस्तक वाचल्यावर...
"यात्रा माझ्या भोवतालची" या प्रकरणाने तर मला या प्रवासाकडे बघण्याची एक वेगळीच दृष्टी मिळाली. एखाद्या विमानावर एखादा पक्षी धडकला तर त्याची मोठ्ठी बातमी होते, अख्खा दिवस सगळ्या वाहिन्यांवर सतत दाखवली/सांगितली जाते. तथापि या रूळगाड्यांना अशा आणि या सारख्या कित्येक गोष्टींना तोंड द्यावे लागते. एव्हढेच नाही तर, त्यानंतर ती गाडी काही काळ उशिराने धावते. म्हणजे एखादी गाडी उशिरा का धावते? याची कारणे अश्या प्रकारची असू शकता असे समजल्यावर, मला तर त्यावर व्यक्तच होता आले नाही... यापुढे जाऊन या रूळगाड्यांखाली होत असलेल्या मानव-आत्महत्या याविषयांवर तर बोलायलाच नको. असे काही झाले तर ते कुटुंब पर उध्वस्त होते. तथापि त्या-त्या कुटुंबावर ही वेळ एकदाच येते.(ती कधीच कुणावर येऊ नये...) तथापि या रूळगाडी चालकांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यात या प्रसंगाला असंख्य वेळा तोंड द्यावे लागते. परत ते चालवत असलेल्या गाडी खाली असे झाल्याने, ते प्रत्यक्ष बघण्याची वेळ त्यांच्यावर येते, परत त्याबद्दलची अपराधी भावना, पाप केल्याची भावना येते ते निराळेच. हे सर्व असूनही पुढे गाडी अपेक्षित स्थळी पोहोचवावी लागतेच...
रूळगाडी इतिहास आणि त्याबद्दलची इतर बरीच माहितीही वाचकाला आश्चर्यचकित करते. पूर्वाश्रमीचे व्ही टी आणि आताचे सी एस टी, हा विषय म्हणजे, आपल्या साऱ्यांचाच अतिशय लाडका आणि मनाच्या जवळचा. तथापि व्ही टी या स्थानकाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज असे नाकारण केल्याने काय काय बदल झाले? ही माहिती वाचूनही, अरेच्च्या असेही होते का? असे वाटल्या वाचून राहात नाही. तसेच या रूळगाड्या इंग्रजांनी सुरु केल्या, आपल्या साऱ्यांनाच माहिती आहे. परंतु त्याची सविस्तर माहिती या पुस्तकांत वाचायला मिळते.(माझा याबद्दलचा संशोधनात्मक अभ्यास नाही, या पुस्तकातील माहिती द्वारे हे विधान केलेले आहे.) सोबतच रूळगाड्या, रूळ आणि संबंधित माहिती, अजून अशीच अगदी तोंडात बोट घालायला लावणारी अनेक प्रकारची मिळते.
या पुस्तकांतील सर्वच विषयांचा या लेखांत उल्लेख केलेला नाही. शेवटचा एक विषय सांगते आणि थांबते. साऱ्यांचाच अतिशय लाडका विषय म्हणजे चित्रपट! चित्रपट मग तो कुठल्याही भाषेतील असो, रूळगाड्यांचा त्यात समावेश असतो. अगदी सगळ्या नाही, परंतु बऱ्याच चित्रपटांमध्ये रूळगाड्या, स्थानक यांचा समावेश असतो. याविषयी सुद्धा अनेक प्रकारची रंजक माहिती एका लेखांत आलेली आहे. एक संपूर्ण जवळ-जवळ चोवीस पानांचे प्रकरण आहे हे.
भारतीय रेल्वे, राजकारण, अधिकारी ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून, सर्वसामान्यांनी या रूळगाड्या, त्याचे चालक यांच्याकडे एक माणूस म्हणून पाहायला हवे असे मला वाटते. प्रत्येक वेळी रूळगाडीतून प्रवास करतांना, म्हणजे सुरुवातीला आणि प्रवास पूर्ण झाल्यावर क्षणभर थांबून, त्या गाडीच्या चालकाला, मनातल्या मनात का होईना, धन्यवाद आणि शुभेच्छा द्यायला हव्यात असे मला मनापासून वाटते...
ll रूळगाडीचालकार्पण मस्तु ll
🚂🚃🚃🚃🚃🚃🚃
झुकू झुकू झुकू झुकू
आगीन गाडी...
©️®️आनंदी पाऊस
(पुस्तकं परिचय)
२९ मे २०२६

छान आहे, तेंव्हा झाडे पळत होती पण आज झाडे नाहीत म्हणून माणसांना पळावे लागते आहे .
ReplyDeleteपरीक्षण वाचून पोट भरले...वाचायचे राहिले होते पुस्तक
ReplyDeleteपुस्तक परिचय वाचून पुस्तक वाचावेसे वाटते. रुळानुबंध शीर्षकच छान आहे, तुम्हीही मस्त परीक्षण केले आहे
ReplyDeleteछान लिहितेस ग
ReplyDeleteKhup chan.👌👌❤️
ReplyDeleteShevtacha paragraph chan.kharokhrch train driver che Aabhar manaylach havet .🙏🙏