Skip to main content

पायऱ्यांची विहीर, बदलापूर (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)

 पायऱ्यांची विहीर, बदलापूर  

(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)


मुंबई म्हटले की बहुतेक सगळ्यांनाच नको वाटते. सगळ्यांना आठवते, दिसते ती गर्दी, ती घाई, ती अस्वच्छता. माझे मात्र तसे नाही, मला मुंबई नितांत सुंदर वाटते. माझे मुंबईवर अतिशय मनापासून प्रेम!  अनेक प्रकारच्या कारणांनी मुंबई भेट होतच असते माझी, अगदी वारंवार. मुंबई भेटीचे कारण काहीही असो, मी माझ्या मनात हेरुन ठेवलेल्या एका तरी ठीकाणाला भेट देतेच देते. यावेळी सुद्धा अशाच एका ऐतिहासिक देखण्या स्थळाला भेट दिली. बर्‍याच वर्षांपासून मनात असलेली इच्छा पूर्ती झाली, तीही अगदी योग्य आणि लाडक्या व्यक्तींच्या सोबतीने. आज तुम्हा सगळ्यांसाठी हीच आभासी सहल/भेट!
पाण्याची मला जीतकी भिती आहे, तितकीच ओढ सुद्धा आहे. मग ते कुठल्याही स्वरुपात असो, समुद्रापासून पाण्याच्या टाकीपर्यंत. गेल्या बर्‍याच वर्षांपासून मला पायऱ्या पायऱ्या असलेल्या पाण्याच्या ठिकाणांची ओढ/वेड लागले आहे. जीथे जाणार असेल तिथे किंवा जीथे जाईल तिथे अशी ठिकाणं शोधून काढते. त्यापैकीच एक म्हणजे बदलापूर, ठाणे इथे असलेली ही पायर्‍यांची विहीर.
मुंबई-कर्जत रेल्वे मार्गावर असलेले उपनगर बदलापूर. अंबरनाथ आणि वांगणी या दोन स्थानकांच्या मध्ये येणारे स्थानक. तर या बदलापूर स्थानकावर उतरून देवलोळी साठी रिक्षा ठरवून या ठिकाणी जाता येते. बदलापूर स्थानकापासून साधारण ७.८ किमी अंतरावर आहे. तीच रिक्षा परतीला सुद्धा ठरवावी लागते. कारण आपल्यालाही दुसरी रिक्षा मिळत नाही आणि रिक्षाचालकाला सुद्धा दुसरे भाडे मिळत नाही.
दुसरा पर्याय म्हणजे या विहीरीच्या आसपास काही अंतरावर दोन-तीन रिझाॅर्ट आणि इतर प्रेक्षणीय स्थळे आहेत. तिथे राहायला गेलात तर तिथुन सुद्धा अगदी जवळच आहे ही विहीर. अगदी सहजच भेट देता येईल.
आम्ही साधारण संध्याकाळी चार-साडेचारच्या सुमारास गेलेलो. उन्हाचे चटके कमी झालेले आणि छायाचित्रं काढण्यासाठी उत्तम नैसर्गिक प्रकाशयोजना! घरुन निघतांना माझ्या बरोबरच्या मंडळींना निटशी कल्पना नव्हती, मी त्यांना नक्की कुठे घेऊन जात आहे. पण तिथे पोहोचता क्षणी त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही! कारण आहेच ही पायऱ्यांची विहीर अतिशय आकर्षक आणि चित्तवेधक! एव्हढेच नाही तर येते वेळी त्या रिक्षावाल्या दादांशी बोलून रिक्षा ठरवत होतो, तेव्हा त्यांनाही फारशी माहिती नव्हती त्याभागाची. त्यामुळे ते काहीशा नाखुशीनेच तयार झाले आमच्या सोबत यायला. पण तिथे गेल्यावर ते सुद्धा आनंदाने एकदम आश्चर्यचकित झाले ही विहीर बघून!
साधारण सतराव्या शतकातील पायऱ्यांची दगडी बांधकाम असलेली विहीर आहे ही. या विहिरीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या विहिरीचा आकार! रिक्षातून उतरल्यावर लांबूनच पाहिले की या विहिरीचा आकार एका भल्या मोठ्या शीवलिंगा सारखा भासतो/दिसतो. आकाशातून पाहिले तर कुलुपाला चावी लावायची जी खाच असते, त्या आकाराची दिसते. तसेच विहिरीच्या गोलाकार भागाकडून पाहिले तर, ती एका भल्या मोठ्या चावीच्या आकाराची दिसते. ही विहीर संपूर्णपणे दगडी बांधकामात असुन गोलाकार भाग उत्तरेकडे आहे तर, निमुळता भाग दक्षिणेकडे आहे. संपूर्ण विहिरीची लांबी चाळीस फूट आहे. यापैकी निमुळत्या भागाची लांबी सव्वीस फूट आहे तर रुंदी आठ फूट आहे. गोलाकार विहिरीचा व्यास चौदा फूट असून खोली पस्तीस ते चाळीस फूट आहे.
या विहिरीत उतरायला साधारण पंधरा पायर्‍या आहेत. आम्ही गेलो तेव्हा(डिसेंबर) साधारण बाराव्या पायरीपर्यंत पाणी होते. खाली उतरताना सहाव्या पायरीवर साधारणपणे चार फूटावर पूर्व आणि पश्चिम बाजूला भिंतीत प्रत्येकी एक या प्रमाणे दोन कोनाडे आहेत. या कोनाड्याच्या कमानीच्या मध्यभागी वरच्या बाजूला तीन पानं असलेले नक्षीकाम दगडात कोरलेले आहे. दिवे ठेवण्यासाठी या कोनाड्यांच्या वापर केला जात असावा. पुढे दोन-तीन पायर्‍या उतरून गेल्यावर पुन्हा पूर्व-पश्चिम दिशांना भिंतीवर प्रत्येकी एक या प्रमाणे दोन शरभ शिल्प आहेत. सद्यस्थितीत मात्र दोन्हीही शरभ शिल्पांचे मुख भंगलेले आहे.
पायरी वर उभं राहून समोर विहिरीकडे पाहिले तर अतिशय देखणी कमान नजरेस पडते. या कमानीच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी एक या प्रमाणे आठ पाकळ्या असलेली दोन फूलं कोरलेली आहेत. या कमानीच्या वरच्या बाजूस तीन शिल्प कोरलेली आहेत. तीनही मूर्ती अतिशय सुरेख आणि सुबक आहेत, पैकी मध्यभागी श्री गणेशाची चतुर्भुज मूर्ती आहे!
या विहिरीच्या एका बाजूला देवलोळी गाव आहे आणि बाकी बाजुनी शेतजमीन आहे. त्यामुळे आम्ही ही विहीर बघत असतांना स्थानिकांची ये-जा चालू होती. त्यातच एक महिलांचा गट तिथुन जात होता. आम्ही विहीर बघत होतो आणि त्याबद्दल बोलत होतो, ते बघून त्या गटातील एक आजी पुढे म्हणाल्या मी लहान असताना या कठड्यावर उभे राहून पाणी काढत होते या विहिरीतून. अजूनही पावसाळ्यात विहिरीच्या सर्व पायऱ्या पाण्याखाली जातात. आजचे तंत्रज्ञान किती प्रगत आहे असे म्हटले जाते. पण तरीही बाराशे-पंधराशे फूट खोल खोदुनही पाणी लागत नाही. 
पण पूर्वीच्या काळी अगदी शिवकालीन असो किंवा मौर्य कालीन असो आजही त्या विहिरी/बारव मध्ये पाणी आहे. नक्की कोण प्रगत आहे किंवा कोणते तंत्रज्ञान प्रगत आहे तुम्हीच ठरवा. आजही या सगळ्या विहिरी, बारवं, कल्याणी, पुष्करिणी, तडाग इ. स्वच्छ करून उपयोगात आणून त्यातून पाणी पुरवठा केला तर आजचा पाण्यावरचा कितीतरी ताण कमी होईल! (डाॅ रा श्री मोरवंचीकर) 
या सगळ्याचा आपण कधी विचार करणार आहोत? खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. पण ते न करता आपण आहे ते पाण्याचे स्रोत बंद करून त्यावर टोलेजंग गगनचुंबी इमारती उभ्या करत आहोत. इथेच न थांबता, पाणी नाही म्हणून ठणाणा करत आहोत. 
म्हणूनच आज डॉ रा श्री मोरवंचीकर यांनी जला संबंधित दिलेला मंत्र फार महत्वाचा आहे..... 
"जलातुन जीवनाकडे बघा!" 

आनंदी पाऊस 
(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या) 
२७ डिसेंबर २०२२ 


खऱ्या पाना-फुलांची सजावट 
मुंबई विमानतळ मार्च २०२२




शिव-लिंगा सारखा आकार 




चावी सारखा आकार 




विहिरीत खाली उतरण्या साठी पायऱ्या




कोनाडा आणि तीन पानांची नक्षी 




मुख भंग पावलेला शरभ 




कमान आणि दोन्ही बाजूला असलेली दोन फुलं




गणपती बाप्पा मोरया!
कमानीच्या वर कोरलेल्या तीन मूर्ती 




याच त्या रंगीत पातळातील आजी! विहिरीच्या पाण्याबद्दल 
माहिती सांगणाऱ्या. 
फोटो काढते म्हटले तर एकदम लाजल्या आणि 
वळल्याच जायला!



मावळत्या दिनकरा...


















Comments

  1. एल झेड कोल्हे सरDecember 30, 2022 7:10 am

    या सहलीत मी सामील आहे असा भास झाला ‌.खरोखर छान माहिती दिलीस बेटा . खूप वेळा बदलापूरला गेलो पण कुणीच या विषयावर चर्चा केली नाही ‌‌.

    ReplyDelete
  2. व्वा! पायऱ्यांची विहीर सुंदरच आहे.आपले पूर्वज खरोखरच खूप हुशार व कल्पक होते. एवढ्या खोलवर जातांनादेखील त्यांनी केलेल्या शिल्पकलेला सलाम🙏🏻. मुंबईच्या इतक्या जवळ असूनही मला पहिल्यांदाच याबद्दल कळले. खरच, आपल्याच आजूबाजूच्या किती गोष्टींबद्दल आपण अनभिज्ञ असतो न. आता केव्हातरी जाऊन पाहून यायला हवे. तसे तुम्ही हुबेहुब वर्णन करून सफर घडवलीच आहे.

    प्रा. सौ. वैशाली चौधरी
    ठाणे.

    ReplyDelete
  3. मनीष चिरमाडेDecember 30, 2022 7:27 am

    सहल फारच मस्त ताई...
    विहीर तर छान दिसतेच पण तुझ्या फोटोग्राफी मुळे अजून सुंदर दिसतेय...
    नेहमी प्रमाणे खुप छान मांडणी शब्दांची त्या मुळे सहलीचा आनंद वाचता वाचता तिच्या जवळ जाऊन आल्याचा मिळाला....👌🙏🏻

    ReplyDelete
  4. मी पण त्या सहलीत सहभागी झाले आहे असे वाटते. फार छान आणि नविन तितकीच रमणीय आणि आश्चर्य चकित करणारी. असेच नविन नविन ठिकाणांची सहल आयोजित करत रहा म्हणजे आमची पण भ्रमंती होईल

    ReplyDelete
  5. लीलाताई वानखेडेDecember 30, 2022 8:14 am

    विहिरी बद्दल अतिशय सुंदर माहिती दिली ताईंनी आम्ही इतक्या वेळा तिकडे गेलो पण माहित नव्हते नवीन माहिती कळाली ज्ञानात भर पडली सहल तर खूपच छान झाली त्याचे वर्णन खूपच सुंदर केले आणि फोटोग्राफी त्याहून सुंदर आहे म्हणजे प्रत्यक्ष केल्याचा अनुभव होतो👌👌👏👏🙋🏻‍♀️💐

    ReplyDelete
  6. खूप छान माहिती मिळाली. जावून बघायचा प्रयत्न करेन. विहिरीचा आकार, पायऱ्या विशेष आहे.
    एकंदर मुंबई सर्वसमावेशक आहे, कुठेही उपनगरात रहात असलेले लोक मुंबईतच रहात असतात

    ReplyDelete
  7. खूप छान माहिती. जाऊन baghavishi वाटतेय आता. 👌👌

    ReplyDelete
  8. खूप छान माहिती दिली. जाऊन baghavishi वाटतेय आता 👌👌

    ReplyDelete
  9. Payryachi vihir khup chan mahiti v sunder photos aahet. Mumbai rahun yabaddal kahich mahit navhate tuzya sahali mule samajale 👍
    Sunder likhan v sarv varanan pan mast 👌

    ReplyDelete
  10. Kharach gharbasalabasala👌 chan sahal zhali, photo mule ajun tyat bhar padali 👍

    ReplyDelete
  11. प्रवास वर्णन आणि स्थळ दर्शनाची लेखनशैली छानच आहे. वाचकांना हुबेहूब अनुभव मिळवून देतेस तू तुझ्या लेखनात. एक दुर्लक्षित पण अप्रतिम देखण्या विहिरीची आम्हा वाचकांना तू माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद. खरंच आपल्या पूर्वजांचे द्यान अफाटच होते आणि त्यांच्या विपुल अनुभवांचा मागोवा घेणे आणि आपल्या ज्ञानात भर घालत राहणे हेच आपल्या हातात आहे. विहिरीला भेट देण्याची योग्य वेळ आणि प्रवासा बद्दल मार्गदर्शन हे अगदी यथोचित आहे. Photography नेहेमीप्रमाणे उत्तम असल्यामुळे विहिरीचा सुबक आणि नेटकेपणा लगेच डोळ्यात भरतो. एका आड वाटेच्या पण अगदी घरा जवळ असलेल्या स्थळाची सफर घडवून आणल्या बद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  12. मुंबईत एवढा मोठ्ठा समुद्र असताना विहिरीचे कौतुक भारिच केलयराव.
    चाविची पायरी-विहिर मस्तय कि!👌
    फोटोपण भारि आलाय..आणि
    आम्ही फारच "LUCKY"ही सहल ह्या लेखारूपी अनुभवता आली.🙏
    पहिला फोटो कोठे क्लिक केलाय?(मुंबईच्या प्रेमाचा😘😍)नाही लिहलाय! कित्ती घाई!!😁

    ReplyDelete
  13. रंजना राणेDecember 31, 2022 5:39 pm

    खरंच खूपच छान माहिती... आजपर्यंत आम्हालाही माहीत नव्हते आता नक्की शोधूनच काढू आणि जाऊच👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻😊😊👍🏻👍🏻

    ReplyDelete
  14. 😊shiv lingacha aakar aasleli vihir baherun pic madhe aakatshak wate
    Aani aatun ti kashi aahe yache shabatun warnan itke ranjak aaheki wactana janu aapan hi kalpnet vihirichi safari karun yeto
    👌pics 👍aanadi paus lekhachi pudhchi safari aama wackana aanandachi hou de limit raha aamhala navin mahiti gost sangitle pramane wachayla milte
    Navin warshache tula all family la shubhecha

    ReplyDelete
  15. गुलाबराव पाथरकरJanuary 01, 2023 7:28 pm

    पायरीची विहीर वाचून मला माझ्या मामाचा गाव आठवला .तीथे अशा दोन विहीरीमधून पिण्यासाठी पाणी आणत असत .

    ReplyDelete
  16. बारव फारच सुरेख. आधुनिक तंत्रज्ञान असे पाण्याचे स्रोत बुजवून मोठ मोठ्या इमारती उभारण्यात खर्ची पडतय. त्यापेक्षा असे जुने स्रोत शोधून काढून परत वापरात आणले तर पाणी टंचाईवर सहज मात करता येईल हा डाँ. मोरवंचीकरांचा मुद्दा पटण्यासारखा आहे. आपण लांब लांबची ठिकाणं बघतो आणि जवळचेी अशी सुरेख स्थळं पाहायची राहून जातात. तू ह्या विहीरीची. मस्त सफर घडव घडवलीस धन्यवाद. फोटो बघून ही बारवं प्रत्यक्ष पाहायची इच्छा अधिकच तीव्र झालीय. लौकरच योग येवो. ह्या सुंदर लेखाबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन.

    ReplyDelete
  17. किसन वराडेNovember 21, 2024 6:52 am

    👆छान माहिती,💐

    ReplyDelete
  18. निता कुलकर्णीNovember 21, 2024 7:46 am

    सुरेख वर्णन करून सहल घडवून आणली आहेस.
    लोकांना अशा गोष्टी माहिती करून द्यायला पाहिजेत .खरं तर हा अनमोल असा ठेवा आहे. जतन केला पाहिजेच.. लोकांना माहिती करून द्यायला हवी आहे. तु फोटो पण पाठवले आहेस ...
    म्हणून तुझे मनापासून अभिनंदन.
    👌👌🙏🌹🌹

    ReplyDelete
  19. उदय बोरगावेNovember 21, 2024 9:49 am

    माझ्या आजोळी पण अशी एक विहीर आहे...
    ती पूर्णपणे डोळ्यासमोर आली... जिथे गणेश विसर्जन केले जायचे..
    पण त्यात उतरण्यासाठी पायर्‍या L shaped आहेत आणि बाकी सर्व लेखात वर्णन केल्याप्रमाणे, बर्‍यापैकी मिळतेजुळते आहे.
    🙏🏻👍

    ReplyDelete
  20. पायऱ्यांच्या विहिरीची खूप छान माहिती आहे.आपल्या पूर्वजांचे कला कौशल अप्रतिम आहे.या सगळ्यांचे संरक्षण होणे गरजेचे आहे.खूप छान लेख आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...