संकल्प + सातत्य = संकलन
(काही अनुभवलेलं...)
सन २०२४ च्या अखेरीस भारतीय टपाल खात्याने एक स्पर्धा आयोजित केली होती "अडीच अक्षर" "ढाई अक्षर". आधीच बरीच कामं हाती घेतली होती, त्यामुळे खूप इच्छा असूनही या स्पर्धेत सहभागी होऊ शकले नाही. तथापि त्या निमित्ताने आनंदी पावसात अजून एक नवीन सदर सुरू झाले! "अडीच अक्षर!" या व्यतिरिक्त मी २०२५ च्या सुरुवातीला एक संकल्प केला, "येत्या वर्षात सर्वांना शुभेच्छा पत्राच्या माध्यमातून शुभेच्छा द्यायच्या!"
या संकल्पाच्या निमित्ताने, निरनिराळ्या प्रकारच्या शुभेच्छा पत्रांचे परत एकदा रेखाटन सुरू झाले. हो, परत एकदा, कारण अगदी अलीकडे काही वर्षांपर्यंत मी अगदी नियमित हे काम करत असे. तथापि मधल्या काही वर्षांत डिजिटल माध्यमांचे वर्चस्व वाढले अणि मी सुद्धा याच माध्यमाचा वापर करू लागले. त्यामुळे ही रेखाटने मागे पडली. त्याचे फार वाईट सुद्धा वाटत होते.
एका वर्षात निमित्त तरी किती! माझी तर पुरती दमछाक झाली. मग शक्य तितकी शुभेच्छा पत्र हाताने रेखाटून केली तर काही डिजिटल माध्यमाचा वापर करून तयार केली अणि काही दोन्ही माध्यमांचा वापर करून तयार केली. तथापि हाताने रेखाटने करून ती प्रत्यक्ष टपाल स्वरुपात पाठविण्यात जो आनंद मिळाला त्याची सर इतरांना नाहीच! तथापि या नवीन माध्यमामुळे तत्परतेने वेळ साधता आली, हे मान्यच करावे लागेल!
पूर्वी टपाल मिळाल्याचा एक सुखद धक्का बसत असे अणि त्यातून अपरिमित आनंद मिळत असे. हल्ली मात्र यातील सुखद धक्का प्रकार लुप्त झाला आहे. कारण ज्या क्षणी तुम्ही टपाल खात्यात नोंदणी करता त्याक्षणी पाठवणाऱ्याला तर संदेश मिळतोच परंतु ज्याला पाठविले आहे त्याला सुद्धा एक संदेश मिळतो. त्यामुळे त्यांना आधीच माहिती होते त्याबद्दल! त्यामुळे surprise मधून मिळणारा आनंद गायब होतो. असो. सुरक्षेच्या दृष्टीने ते योग्यच आहे. काही महत्त्वाची कागदपत्रे असतील आणि गहाळ झाली तर शोधण्यास नक्कीच मदत होते, याचा मी पुरेपुर अनुभव घेतला आहे. टपाल खात्याच्या सुविधेला पर्याय नाही, तेही अगदी वाजवी दरात! टपाल खाते प्रेम!
काही वेळा तारीख नीट लक्षात येत नाही, काही वेळा इतर कामाच्या व्यापात हे काम राहून जात असे. मग अशा वेळी मी काढलेल्या प्रकाशचित्रांचा वापर करून काही शुभेच्छा पत्र तयार केली. यातही एक आगळा आनंद मिळाला हे मान्यच करावे लागेल, परत वेळ वाचून वेळ साजरी करता आली!
काही वेळा स्वतः केलेली शुभेच्छा पत्र तयार होती, तथापि ती टपाल खात्याने पाठविणे शक्य झाले नाही. अशा वेळी त्याचाच वापर करून डिजिटल शुभेच्छा पत्र तयार करून ते, त्या त्या व्यक्ति पर्यंत डिजिटल माध्यामातून पोहोचते केले. डिजिटल माध्यमाची आगळी जादू!
हे काही एखादे महत्त्वाचे वर्ष ठरवून केले नव्हते. तथापि योगायोग म्हणजे कुणाची पंच्याहत्तरी, कुणाची पन्नाशी, कुणाची पंचविशी, कुणाचे लग्न असे एक ना अनेक महत्त्वाचे योग आले अणि ते सर्व या छोट्याशा संकल्पाने, विशेष पद्धतीने साजरे झाले! असीम आनंद!
एक छोटासा संकल्प केला, त्यात सातत्य ठेवले अणि वर्ष अखेरीस पाहिले तर या शुभेच्छा पत्रांचे एक भले थोरले संकलन झाल्याचे लक्षात आले! खाली या संकलनाची झलक स्वरुपात काही शुभेच्छा पत्र आहेतच, अर्थातच डिजिटल माध्यामातून आपल्या पर्यंत पोहोचवित आहे! झलक आहे कारण काहींचे छायाचित्र घ्यायचे विसरले अणि तसेच पाठवून दिले, तर काही डिजिटल स्वरूपातील खोडून टाकले वगैरे वगैरे अशा अनेक कारणांमुळे सर्व संकलन माझ्याकडे झालेच नाही. या सगळ्या बद्दल आपल्याला काय वाटले ते जाणून घेण्यास उत्सुक आहे... आपल्या अभिप्रायातुन नक्की कळवा!
आनंदी पाऊस
(काही अनुभवलेले...)
१ जानेवारी २०२६




























छान लेख
ReplyDeleteआठवतात मला ही पत्र
ReplyDeleteछान शुभेच्छा पत्रे आणि लेखही.
ReplyDelete—-प्रा वैशाली चौधरी
अप्रतिम लेख. नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप सार्या शुभेच्छा. ✨✨✨💐💐💐💐💐
ReplyDeleteजय श्रीराम...!!! 🙏🏻🙏🏻
ReplyDeleteजय हिंद...!!!
स्व लिखित/हस्तलिखित पत्रं अथवा शुभेच्छा खासच असायच्या....त्यांना आजही तोड नाही. तू ही आवड जपून ठेवली आहेस, पण पोस्टाद्वारे त्या अपेक्षित व्यक्तीला पोहोचतील याचीच शाश्वती नाही....असो !!
सर्वांना नवीन वर्ष २०२६ साठी अनेक हार्दिक शुभेच्छा......
💐💐🚩🚩🇮🇳🇮🇳👍👍
सुंदर..... पत्र लेखन हे आनंद देणारे क्षण होते.
ReplyDeleteशुभांगी
अप्रतिम, जुन्या आठवणींना उजाळा
ReplyDeleteखुप सुंदर!!!
ReplyDelete🌳🍦👣
ReplyDeleteशुभेच्छा पत्र सुंदर 👌
ReplyDeleteजुन्या आठवणी जाग्या झाला ़ लेखही छान
👌🏻👌🏻 खूप छान संकल्प व शुभेच्छा पत्रे सुद्धा . मी त्या पोष्ट स्पर्धेत सहभागी झाले होते पण पुढे काय झाले कळलेच नाही .
ReplyDeleteवसंत बापट यांनी, इंदिरा संतांची...कितीतरी कविता आठवल्या...
ReplyDeleteसुरेख रेखाटने👌👌👌