Skip to main content

कृष्ण-जन्मदिनानिमित्त!(featured)

🪻 कृष्ण-जन्मदिनानिमित्त!

(featured)






कृष्ण!
राधेचा कृष्ण!
मीरेचा कृष्ण!
गोपींचा कृष्ण!
देवकीचा कृष्ण!
यशोदेचा कृष्ण!
सखा कृष्ण!
भारतीय स्त्रियांचा सखा कृष्ण!
सकल भारतीयांचा सखा कृष्ण!
अगदी पुराण काळापासून भेटत आलाय.
अतिशय बाल वयापासून भेटत आलाय. 
आई-आजीने सांगितलेल्या पौराणिक कथांतून! 
                     तेव्हा पासूनच मना-हृदयात कृष्णाचे एक अढळ स्थान असते, प्रत्येक भारतीयाच्या. तसेच माझ्याही बाबतीत झाले. नंतर स्वतः वाचन करायला लागल्यावर तर, अजूनच जीवाभावाचा सखा झाला. कर्ण, राधेय, युगंधर, श्रीकृष्ण सारख्या पुस्तकांमधून तर, परत-परत भेटत असतो. वारंवार, अगदी पुन्हा-पुन्हा! तर कधी कधी त्याला भेटायचे असते, म्हणून मी ह्या पुस्तकांमधील काही भाग वारंवार वाचत असते. 
                   मधल्या काळात दूरदर्शनवर महाभारतावर आधारित एक मालिकाच आली, महाभारत! आणि या महाभारताने अगदी खराखुरा, जीता-जगता, चैतन्यमयी कृष्ण दिला, सकल भारतीयांना! नितीश भारद्वाज! वाचनातून कायमच कृष्णाची एक मूर्ती मनांत साकारली होती. पण या महाभारताने, त्या मूर्तीला एक चेहरा दिला, प्रसन्न, हसतमुख, काहीसा खट्याळ! तोपर्यंत वाचनांत आलेल्या कृष्णाला साजेसा! 
                              मग हाच कृष्ण माझ्यासहित, सर्व भारतीयांच्या मनांत कायमचा घर करून राहिला, विशेषतः त्याच्या चेहऱ्यावरील प्रसन्न पण, काहीसे खट्याळ हास्य! आज ह्या कृष्णाच्या  जन्मदिवसाचे निमित्त! ह्या कृष्णाला प्रत्यक्ष भेटण्याचा योग आजतागायत कधी आला नाही. पण हा योग लवकरच येईल, अशी खात्री वाटते. कारण या कृष्णाचे अगदी जवळचे मित्र, माझेही मित्र आहेत, त्यांनी मला विश्वासपूर्वक सांगितले आहे, त्यांच्याशी माझी भेट घडवून देण्याबद्दल! 
                             तथापि प्रत्यक्ष दर्शनाचा योग मात्र आला, तेही अगदी एका दैवी निमित्ताने, प्रत्यक्ष रथावर सारथ्य करतांना! १९८७ मधील भाद्रपद महिना पहाटेची वेळ. सगळीकडे अजूनही काळोख. सर्वत्र माणसांची गर्दी. नजर जाईल तिकडे माणसच माणसं. जन-सागरच जणू! स्थळ अलका चौक, पुणे. अचानक ती गर्दी चैतन्यमयी झाली. एका वेगळ्याच प्रसन्न आनंदाची लाटच आली जणू! अंधारातून, गर्दीतून एक तेजस्वी रथ समोर आला! हा रथ म्हणजे गणपती विसर्जन मिरवणुकीतील दगडूशेठ हलवाई गणपतीचा रथ! रथ तर तेजस्वी होताच, तथापि त्या रथाचा सारथी अधिकच तेजस्वी! चेहऱ्यावर तेच प्रसन्न, आनंदी आणि काहीसे खट्याळ हास्य! अर्थातच हा सारथी म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका श्री कृष्ण, नितीश भारद्वाज! जणू रथ साक्षात स्वर्गातूनच पृथ्वीवर अवतरला! काही तासांपासून तिथे बसलो होतो, रस्त्यावर. पहाटे तीन-चार वाजल्यापासून. इतका वेळ अलकाच्या चौकात रस्त्यावर बसून वाट बघण्याचे, सार्थक झाल्यासारखे वाटले! डोळ्यांचेच नाही तर मना-हृदयाचे पारणे फिटले! आयुष्यातील एक अतिशय आनंददायी, स्वर्गीय, दैवी क्षण! इतक्या वर्षानंतर सुद्धा डोळ्यासमोर जसाच्या तसा लख्ख तर दिसतोच आहे, तथापि त्या क्षणातील आनंद, प्रसन्नताही अनुभवता येतेय! परत परत जगता येणारा एक चैतन्यमयी क्षण!  
                               चार वर्षांपूर्वी, तुमचा जन्मदिवस होता! तथापि आदल्या दिवशीच्या काही गोष्टींमुळे माझे मन काहीसे अस्वस्थ होते, मनाची उभारी हरविल्या सारखे झाले होते. सकाळीच तुमच्या वाढदिवसानिमित्ताने, तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी म्हणून एका मैत्रिणीने सोशिअल मिडीयावर पोस्ट केलेले तुमचे प्रकाशचित्रं समोर आले. जादूच झाली! मनातील सगळी मरगळ कुठल्या कुठे पळून गेली आणि मन छान प्रसन्न आनंदाने ओतप्रोत भरून गेले! कृष्णाच्या आनंदी, खट्याळ प्रसन्न हास्याची जादू...!


🌿🌼🪻जन्मदिनानिमित्त खूप खूप प्रसन्न आणि आनंदी शुभेच्छा!🪻🌼🌿
अगदी आपल्या हास्य सारख्या!

🪻🪻🪻कृष्णार्पन्मास्तु 🪻🪻🪻


🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸


🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿


🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


🍀🍀🍀🍀🍀


🌺🌺🌺


🪻






हेच ते प्रसन्न, आनंदी, जादुई हास्य!






मित्रासोबत सोबत एक निवांत क्षण!
(सर्व प्रकाशचित्र सौजन्य : केशव कुलकर्णी)


आनंदी पाऊस
(featured)
२जुन २०२४ 

Comments

  1. छान अनुभवलय 💐

    ReplyDelete
  2. व्वा! छान ! कृष्ण म्हटला की खरच फक्त दोनच चेहरे समोर येतात ते म्हणजे स्वप्नील जोशी व दुसरा नितीश भारव्दाज 👍
    प्रा सौ वैशाली चौधरी
    ठाणे

    ReplyDelete
  3. डॉ दीपक शिरसाठMay 31, 2024 8:09 am

    छान आत्मप्रचिती🌹🌹🌹

    ReplyDelete
  4. मंदा चौधरीMay 31, 2024 12:56 pm

    सुंदर आत्म प्रचीती . सुंदर लिखाण . खरोखरच एक आनंदाच्या उर्मीचा क्षण.

    ReplyDelete
  5. भारती फेगडेMay 31, 2024 2:18 pm

    काही व्यक्तिरेखाच अशा असतात की त्यांच्या दिसण्याचे वातावरण प्रसन्न होऊन जाते. चैतन्य नर्माण होते. मरगळ दूर होते.

    ReplyDelete
  6. उषा पाटीलMay 31, 2024 3:56 pm

    फार पूर्वी कृष्णाला लोक देव म्हणत होते आणि आदर करत होते पुढे महाभारतातल्या नितीश भारद्वाज ला पाहिल्यावर त्याचा सुंदर अभिनय पाहिल्यावर लोक त्या कृष्णवर प्रेम करू लागले फारच जबरदस्त अभिनय वा लेखन पण खूप सुंदर
    त्याचे गोड हसणे अगदी मनात बसून गेले

    ReplyDelete
  7. सुनिता पाचपांडेMay 31, 2024 4:16 pm

    Khup sundar lihile aahe

    ReplyDelete
  8. Krushna = nitish Bhardwaj. Madam thanks tumche likhan khup chan aahe शब्द मांडणी khupchan aahe mala vachnyachi aavad lagli नव्याने.

    ReplyDelete
  9. अगदी मस्तच...कृष्णमय लेख जालाय...
    खरोखरच रूक्मिणी ही कृष्णाची पत्नी जरी असली तरी..प्रेयसीचा मान हा राधाचाच!
    ..
    हो नितीश भारद्वाज ह्यांनी महाभारतातील कृष्ण देवांची भूमिका माझ्याही मनात रूजलेली आहेच...त्यांना माला अक्कलकोट दर्शनासाठी गेल्यावर पाहण्याचा योग आलेला...मग कळाले ते एक पशूचिकित्सक डॉक्टर आहेत..आणि काही वर्षांनंतरही मी ठरवलं की माझा architecture ला thesis project mi veterinary hospital घेईन....
    काळाशी समरूप होणे म्हणजे कृष्ण होणे हे व पु चं वाक्य कृष्णदेवांच्या मूर्ती कडे पाहून सारखं माला वाटतं - जयश्री कृष्ण संजिता

    ....

    ReplyDelete
  10. भाग्यश्री पाटसकरJune 03, 2024 6:13 pm

    फेब्रुवारीत बंगळूरमधे आम्ही ट्रेनने आलो होतो. संस्कार भारतीच्या कार्यक्रमांमधे डॉ नितीश भारद्वाज आमचे केंद्रीय मार्गदर्शक आहेत. बंगळूरच्या कलासाधक संगमात त्यांच्या नाटकाचा छोटासा प्रयोगही होता. संगीत नाटक अकादमीचे सदस्य आणि ज्येष्ठ अभिनेते संजय पवारही सोबत होते. पन्नासेक कार्यकर्ते आणि हे ज्येष्ठ, लोकप्रिय, मान्यवर अभिनेते सोबत होते.
    या दोघाही मान्यवरांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे कारण सर्वांसोबत सहजतेनं मिसळणं, जेवणं, गप्पा , हास्यविनोद करत ते सर्वांमधे मिसळले.
    नितीशजींना बघायला तर किती लोक येत होते. विशेष म्हणजे अगदी तरूण, उच्च शिक्षित मुलंसुद्धा चप्पल काढून त्यांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करत होते. ते सर्वांना जवळ घेऊन, आपुलकीने चौकशी करत होते. "मी साधा माणूस आहे हो! मी भगवान श्रीकृष्ण नाही." असं आवर्जून सांगत होते. पण सगळ्यांनी हेच सांगितलं की आमच्या मनातला श्रीकृष्ण तुम्ही साकार केलात!
    एखादी भूमिका करणारा नट आणि श्रीराम, श्रीकृष्ण, शिवाजी महाराज अशा व्यक्तिरेखा साकारणारा कलाकार यात खूप फरक असतो. डॉ नितीश भारद्वाज यांनी कोणतेही व्यसन केले नाही. वागणं बोलणं नेहमीच मृदू राहील याची काळजी घेतली. योग्य व्यायाम, आराम आणि आहार यांचं गणित बिघडू दिलं नाही. कारण आपल्याकडे 'श्रीकृष्ण' म्हणून लोक बघतात याची जाणीव कायम ठेवली. भारतीय इतिहास, संस्कृती, धर्म आणि तत्त्वज्ञान यांचा अभ्यास केला. सर्वांनाच मोहवून टाकणारं स्मितहास्य कायम राहण्यामागे ही साधना आहे! 🙏🏻🌹

    ReplyDelete
  11. Nitish BharadwajJune 05, 2024 6:49 am

    Thnx to yr friend who wrote this piece

    ReplyDelete
  12. अप्रतिम...

    ReplyDelete
  13. खूप छान कृष्णमय लेख झाला आहे.खूप छान पद्धतीने वर्णन केले आहेस.चैतन्यमय व्यक्तिरेखा साकारली होती. अप्रतिम.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...