Skip to main content

एक आगळा त्रिवेणी संगम! (खास व्यक्ती-काही अनुभवलेले...)

एक आगळा त्रिवेणी संगम!

(खास व्यक्ती-काही अनुभवलेले...) 


लेवा समाज
लेवा बांधव
या बांधवांची मातृभाषा
"लेवा गण बोली"
आपल्या प्रत्येकाला
अगदी समजायला लागल्या पासून कळत असते, 

प्रमाणीत मराठी भाषेपेक्षा आपली भाषा वेगळी आहे.

तथापि
तिचे नाव काय?
ती अशी वेगळी का?
या गोष्टी समजायला बराच वेळ लागला
मला सुद्धा
तसेच आपल्या घराघरात प्रयत्न होत होते, आपल्या मुलांनी ही भाषा न बोलता, प्रमाणीत मराठी भाषा शिकावी आणि बोलावी.
आजही हे प्रयत्न चालूच आहेत
हे बघून अतिशय वाईट वाटते

प्रमाणीत मराठी भाषा शिकण्यात आणि बोलण्यात गैर काहीच नाही.
तथापि
आपली मातृभाषा असलेल्या "लेवा गणबोली"त बोलणे कमी पणाचे वाटणे,
लेवा गण बोलीत बोलणाऱ्या व्यक्तीची टिंगल करणे, त्यांना कमी लेखणे
ह्या बाबी अतिशय क्लेश कारक आहेत.

३ डिसेंबर आदरणीय कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा स्मृतीदिन!
आणि
हाच दिवस "विश्व लेवा गणबोली दिवस" म्हणुन जाहीर करण्यात आला आहे.
तो साजरा केला जातो याच दिवशी,
निरनिराळ्या प्रकारे, निरनिराळ्या माध्यमातून.
तसेच,
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नामकरण
"कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ" असे करण्यात आले आहे.
तसेच लेवा गण बोली म्हणजे स्थानिक बोली भाषेपैकी एक!
त्यामुळे त्या संदर्भात विद्यापीठात बरेच कार्यक्रम राबविले जातात.
यासाठी एक स्वतंत्र विभाग सुद्धा सुरु करण्यात येणार आहे!

त्यातीलच एक म्हणजे "विश्व लेवागण बोली दिन" निमित्ताने,
'व्याख्यान आणि कवी संमेलन'
असा कार्यक्रम आयोजित केला होता.
योगायोगाने मला ह्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे अहो भाग्य मिळाले!
तिथे जे काही अनुभवायला मिळाले, ते इथे शब्दांत मांडून,
आपल्या सगळ्यांनाही या कार्यक्रमाचा आभासी अनुभव द्यावा असे वाटले,
त्यासाठी हा सगळा घाट.

व. पू. होले!
नाव आणि व्यक्ती साऱ्यांनाच अगदी छान परिचित आहेच!
तरीही मला त्यांच्याबद्दल बऱ्याच दिवसांपासून लिहायचे होते.
आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी माझी ही मनोकामना पूर्णत्वास नेत आहे.

व.पू.होले,  लेवा गण बोली आणि विश्व लेवा गण बोली दिन!
असा त्रिवेणी संगम अनुभवण्याचा स्वर्गीय योग! 
या कार्यक्रमाच्या काळात मी जळगावला होते आणि मला या कार्यक्रमाबद्दल कळले.
मी लगेचच होले सरांशी संपर्क साधला आणि त्यांनी या कार्यक्रमाचे आमंत्रण तर दिलेच सोबत आमंत्रण पत्रिका सुद्धा पाठविली!
कोण आनंद झाला म्हणून सांगू!

बरं विद्यापीठात जायचे म्हणजे सोपी गोष्ट नाही.
सगळ्या शक्यता पडताळून, शेवटी एका रिक्षावाल्या दादांना कळविले,
आणि ते सोडण्यास तयार पण झाले. ते दादा मला घरी येऊन विद्यापीठात सोडण्याचे ठरले.

त्यानंतर, दोनच मिनिटात होले सरांचा फोन आला.
म्हणाले, तू मू. जे. महाविद्यालय चौफुलीवर ये, 
मी तुला माझ्या सोबत विद्यापीठात घेऊन जाईल.
मग त्या दादांना त्यांची फेरी रद्द करण्यास सांगितली.

थोडा विचार करा,
तसे पाहता ही कृती फारच सामान्य वाटते.
तथापि ते तसे नाही.
"विश्व लेवा गण बोली" निमित्ताने कार्यक्रम, त्यातील प्रमुख वक्ते "व. पु. होले" सर!
कुठला प्रमुख वक्ता हे सगळे करणार?
केवळ मलाच नाही तर, या कार्यक्रमातील एक कवयत्री आणि माझ्या सारखेच एक श्रोते या सगळ्यांना ते त्यांच्या गाडीतून घेऊन गेले,
आमच्या सगळ्यांच्या सोयीच्या जागेवरून!
ते down to earth वगैरे म्हणतात नं, त्या पलीकडचे आहे हे सगळे!

आता पर्यंत सरांची अनेक वेळा ऑनलाईन प्रणाली द्वारे, भ्रमणध्वनी द्वारे तसेच एकदा प्रत्यक्ष भेट झालेली होतीच.
तसेच त्यांची काही व्याख्याने ऑन लाईन प्रणाली द्वारे तसेच रेकॉर्डिंग द्वारे ऐकलेली होती, निरनिराळ्या विषयावरील.
प्रत्यक्ष व्याख्यानं ऐकण्याची तेही लेवा गण बोली या विषयावरील पहिलीच वेळ होती. 

सुरवातीचे दीप-प्रज्वलन, स्वागत वगैरे कार्यक्रम आटोपले आणि सर बोलायला उभे राहिले. 
सभागृह तुडुंब भरलेले होते. तथापि त्यातील निम्म्यापेक्षा जास्त लोकांना लेवा गणबोली तर सोडाच,
मराठी भाषा सुद्धा समजत नव्हती.
पण सरांनी बोलायला सुरुवात केली आणि अख्ख्ये सभागृहच जिंकून घेतले.
प्रत्येक दोन-चार वाक्यांवर टाळ्यांचा कडकडाट!
मला तर काय करू आणि काय नाही असे झाले.
प्रत्यक्ष ऐकायचे होतेच!
शिवाय परत परत ऐकता यावे,
तसेच तिथे हजर नसलेल्यांना ऐकायला मिळावे म्हणून रेकॉर्डिंग सुद्धा करायचे होते.
आणि उत्स्पुर्त प्रतिसाद म्हणून अखंडपणे टाळ्या वाजवायच्या होत्या!
मग थोड्या थोड्या प्रमाणात या तीनही गोष्टी केल्या!
हे सगळे रेकॉर्डिंग खाली देत आहेच!

या सगळ्यात आपल्या "लेवा गणबोली" कडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टीकोन मिळाला.
या बोली भाषेतील बोलतांना येणारी लय आणि त्यामुळे त्यात निर्माण होणारा गोडवा समजण्यास सुरुवात झाली.
त्या दृष्टीने कधी या बोली भाषेकडे पाहिलेच नव्हते. कितीतरी कवाड उघडत गेली...

आणि 
विचार आला, आपली बोली भाषा म्हणून तर आपण तिचे जतन, संवर्धन करायलाच हवे!
तथापि,
आपल्या या विविधतेने नटलेल्या भारत देशातील एक अतिशय समृद्ध, गोड, अमृत वाणीची सर्वांनाच ओळख करून देणे गरजेचे आहे.
त्यासाठी आपण आपापसात बोलतांना या आपल्या बोली भाषेचाच वापर केला पाहीजे, तसा आग्रह धरला पाहीजे.
शक्य तितक्या आणि तशा प्रकारे तिचा रोजच्या व्यवहारात उपयोग करायला हवा!
तरच ही बोली भाषा जीवंत राहील आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचेल.

या बोली भाषेबद्दल होले सरांचा खूप सखोलच नाही तर चैतन्यमयी अभ्यास आहे. तो त्यांच्याकडून शिकून, समजून घ्यायला हवा आहे, जास्तीत जास्त लोकांनी.
त्या सोबतच अनेक सदस्य लेवा गणबोलीत लेखन करतात, दोन्ही गद्य-पद्य!
सरांच्या व्याख्यानासोबतच अरविंद नारखेडे सर यांना भेटायची, त्यांच्याशी संवाद साधायची संधी मिळाली आणि त्यांच्या स्वलिखित कविता-वाचन सुद्धा ऐकायला मिळाले.
या व्यतिरिक्त संध्या भोळे, संध्या महाजन, शीतल पाटील यांच्या स्वलिखित कवितांचाही आस्वाद घेता आला!  
यांचा खूप मोलाचा वाटा आहे या गणबोलीच्या जतन संवर्धनात!
किती नाव घ्यावी तेव्हढी थोडी आहेत. 
त्यात एक सगळ्यात आघाडीचे नाव म्हणजे "लीला गाजरे" काकू! हा पण एक स्वतंत्र विषय आहे लेखनाचा, माझ्या यादीतील!

तर आजचा विषय आहे व.पु.होले सर!
त्यांचा मूळ विषय जीवशास्त्र! पण त्यापलीकडे जाऊन त्यांचे मराठी आणि लेवा गणबोली वर जबरजस्त प्रभुत्व! 
त्यांची आजपर्यंत अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. नक्की आकडा मला माहिती नसल्याने तो देवू शकत नाही.
तथापि त्यांच्या काही पुस्तकांची छायाचित्रं सोबतच देत आहे.

माझी त्यांची ओळख अगदी अलीकडची म्हणजे करोना काळातील! पण असे वाटते माझी फार जुनी ओळख आहे त्यांच्याशी.
त्यांच्या एका पुस्तकाबद्दल ऐकले आणि ते वाचावेसे वाटले म्हणून त्यांना विचारले, कुठे मिळेल?
तर म्हणाले पत्ता दे, मीच पाठवतो. लगेचच पुस्तकं मिळाले मला!
त्यांना भेटायची खूप मनापासून इच्छा होती. पण जळगावला जाणेच फार दिवसांनी होते आणि सर सावद्याला राहतात.
त्यामुळे भेट कधी होईल याबद्दल मी साशंक होते. 
गेल्या वर्षी माझ्या श्वसुरांना देवाज्ञा झाली, त्यामुळे मी जळगावी गेले होते. त्या दरम्यान सरंशी भ्रमण ध्वनीवर बोलणे झाले.
त्यांना सांगितले अशा कारणाने मी जळगावात आहे. परंतु आपणास भेटण्यास येत येणार नाही.
ते लगेच म्हणाले, मीच येतो भेटायला. एक सभा आहे त्यासाठी यायचेच आहे, थोडा लवकर येऊन तुला भेटून मग जाईन सभेला.
सांगितल्या दिवशी भेटायला तर आलेच पण सोबत माझ्यासाठी भेट म्हणून त्यांच्या पुस्तकांचा अख्खा संचच घेऊन आले!
आणि दुसरी भेट, विश्व लेवा गणबोली दिनानिमित्ताने!

हा कार्यक्रम संपेपर्यंत बराच उशीर झालेला होता. उशीर झाल्यावर विद्यापीठातून गावात येणे अतिशय कठीण काम.
पण सर होतेच सोबत! 
कार्यक्रम संपला, पण कोण कोण भेटले, कुणा-कुणाशी भेटून बोलायचे होते त्यामुळे मी वेगवेगळ्या विभगात जाऊन बोलत होते.
त्यामुळे अजूनच उशीर होत होता. संध्याकाळची वेळ, म्हणजे हायवे वर रहदारी पण खूप असते. त्यात सरांना सावद्यापर्यंत प्रवास करायचा होता.
मी त्यांना जायला सांगूनही ते माझ्यासाठी थांबले, अगदी बराच उशीर होईपर्यंत.
मी आल्यावरच निघाले, मला सोडले आणि पुढे प्रस्थान केले!
आपण सगळे फार भाग्यवान आहोत!
अशा सगळ्या थोर व्यक्तींची शिकवण आणि आशीर्वाद कायम आपल्या पथाशी आहेत...!


आनंदी पाऊस
(काही अनुभवलेलं...)
८ डिसेंबर २०२३


















































Comments

  1. संध्या भोळेDecember 08, 2023 12:33 pm

    खूप सुंदर
    विश्व लेवागणी बोली दिन आणि त्यानिमित्ताने तुम्ही भेटलेलं एक असामान्य व्यक्तिमत्व👌👌
    त्यादिवशीचा प्रत्येक क्षण शब्दातून खूप छान तुम्ही बांधला
    खूप छान वाटले तुमच्यासोबत

    ReplyDelete
  2. Seemantini ChaphalkarDecember 08, 2023 1:30 pm

    कार्यक्रमाची चांगली नोंद. लेवा गणबोलीची थोडी गोडी मलाही चाखता आली आहे. काही श्राव्य साहित्याची जोडणी मिळाली तर पुनः आनंद घेता येईल.

    ReplyDelete
  3. लिलाताई गाजरेDecember 08, 2023 4:57 pm

    गह्यरी मस्तज सांगली व माय तुनं तं आपल्या लेवा गनबोलीची गाथा .अन् होले सरायच बी गह्यरज कवतुक केलाय .अन् मंधीज माह्यबी नाव घूसाळी देलाय .गह्यरं साजरं लागलं व माय वाचीसन तं .आसज लिहित राहात जाय अन् मी वाचत जाईन .मले तुह्य लिहेल आनंदी पाऊस लय पट्टतो .मी त्या पावसात लयमूक्ती भाजीसन न्हाई घेते .असाज आनंदी पाऊस पाळी टाकत जाय माह्या घरात बी .तुह्या आनंदी पावसाले लयमूक्त्या शुभेच्छा बह्यनाजी .👍👍💐💐💐👏👏🤝😄✒️🍫

    ReplyDelete
  4. रेखा अत्तरदेDecember 08, 2023 4:58 pm

    खूप छान! 👍🏻👌👌

    ReplyDelete
  5. व पु होलेDecember 08, 2023 5:53 pm

    धन्यवाद 🙏🙏
    प्रसंग उत्तम प्रकारे शब्दबध्द केला आहेस.अर्थात तुझी लिखाणाची पध्दत वाचनीयच असते.छान लिहिलं आहे.🙏🙏🙏🙏

    ReplyDelete
  6. गुलाबराव पाथरकरDecember 08, 2023 7:09 pm

    आपल्या सुक्ष्म अहंकार जपण्याच्या पद्धती मुळे एक एक करून अनेक बोली भाषा नष्ट होत चालल्या आहेत ही फारच वाईट बाब आहे .

    ReplyDelete
  7. Khup sundar lihita tai tumhi
    Tumcha anand pratek shabdatun janvat aahe

    ReplyDelete
  8. त्रिवेणी संगम मस्तच . कोणतीही बेलीभाषा जशी बेालण्याने जिवंत रहाते तशीच साहित्यिकांमुळेही जिवंत रहाते. परंतु आजकाल भारतातच नव्हे तर जगभर बोलीभाषांचा ऱ्हास होत चालला आहे. नवीन पिढी तर प्रमाणीत मराठी भाषेतही बोलत नाहीत. त्यामुळे अशा व्याख्यांनांमुळे अस्तित्व टिकवून ठेवायला मदत होईल आणि होलेसरांसारखे लेवा भाषेचे उपासक ते टिकवून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत.

    प्रा सौ वैशाली चौधरी
    ठाणे.

    ReplyDelete
  9. खूपच छान लिहिलंय ,सुंदर 👍✌️

    ReplyDelete
  10. वाहच,खूप स्तुत्य आणी कौतुकास्पदच...अश्या त्रिवेणी संगमामुळे लेवा बोलीभाषेच्या‌अमृत गोडीचा आनंद माला‌ कळाला‌.
    लेवा बोली भाषा अप्रुपच आहे वाचताना व ऐकताना
    मनात कुतूहल निर्माण करणारी आहे.
    आपल्या लेखातून ती "conserve " होत आहेच...आपणही ह्या भाषेतून काही भावना /विचार वा लेख लिहावं वा ध्वनिफीत ऐकवावी ही सद इच्छा.-संजिता

    ReplyDelete
  11. ए पी पाटीलDecember 15, 2023 9:14 pm

    प्राध्यापक व. पु. होले म्हणजे लेवा समाजाला व्यक्ती, व्यक्तिमत्व आणि लेखक म्हणून मिळालेलं एक वरदानच आहे. याचा मलाही वेळोवेळी अनुभव आलेला आहे. पंधरा-सोळा वर्षांपूर्वी एम.जे. कॉलेजला आम्ही त्यांचे व्याख्यान ठेवले होते. मला वाटतं अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना एचआयव्ही बद्दलची त्यांनी माहिती सांगितली होती. त्यावेळेला त्यांनी तो, तसा संवेदनशील विषय विद्यार्थ्यांना इतक्या अप्रतिम पद्धतीने समजावून सांगितला होता की, तेव्हापासून व. पु. होले म्हणजे जीवशास्त्राचे प्राध्यापक नव्हे, तर एक मराठी वाङ्मयातील प्रथितयश व्यक्तिमत्व म्हणूनच सतत माझ्या डोळ्यासमोर राहिले.
    आमच्या सोबत सर दोन-तीन वेळेला धार्मिक सहलीलाही बरोबर होते. त्यादरम्यानही ते सामान्यातले अतिसामान्य व्यक्तिमत्व म्हणून वावरत असत, परंतु काही वेळेला रात्री त्यांचे कथाकथन व्हायचे, त्यावेळेला त्यांची विद्वत्ता, अनुभव संपन्नता आणि मराठी व लेवा गणबोली वरील प्रभुत्व पाहून आम्ही थक्क व्हायचो. दैनिक सकाळमध्ये त्यांनी लिहिलेले लेवागणबोलीतील सदरही बऱ्याच वेळा माझ्या वाचनात आलेले आहे.
    निवृत्तीनंतरही सर कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमांत किंवा समाजकार्यांत व्यस्त असतात. एवढ्या व्यस्ततेतही आमच्या व्हाट्सअप वरील मेसेजेसला लगेच प्रतिसादही देत असतात, यातच त्यांचे मोठेपण सामावले आहे. असो.
    असे प्रसन्न व्यक्तिमत्व तू आनंदी पावसातील "त्रिवेणी संगमा"त शब्दांकित केलं, त्यामुळे माझ्या काही स्मृती जागृत झाल्या आणि दोन शब्द लिहावेसे वाटले. धन्यवाद!🙏🏼

    ReplyDelete
  12. 😊 khare aahe pratekache manatla mor aanadane nachat aasto tuzesarkhe rasik all rounder jivnatil pratek chote chote gosticha anandacha mor tar mala aagla weglach bhasto
    Tuze dhyAn lagte Aani sunder Citra rupane too prakat hoto sarech mor chitre khoop sunder kadhli aahes
    Asech chan pahayla wachayla milu de👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...