Skip to main content

!, अशी ही विराम चिन्हं;? (काही अनुभवलेलं...)

 !, अशी ही विराम चिन्हं;? 

(काही अनुभवलेलं...)


               भाषा कुठलीही असो, व्याकरण हा अगदी न टाळता येणारा, अविभाज्य भाग असतो. व्याकरणातील, त्यातल्या त्यात चित्तवेधक आणि थोडा सोप्पा भाग म्हणजे विराम चिन्हं. अगदी बाल वयापासून आपले प्रत्येकाचेच, प्रत्येक विराम चिन्हाशी काही न काही नाते जडलेले असते. मानवी नात्यांप्रमाणेच, काही विराम चिन्हं अतिशय आवडती, काही नावडती, काही नकोशी तर काही वेळ-प्रसंगानुसार कधी आवडती तर कधी नावडती. माझेही असेच आहे. आज या सगळ्या विराम चिन्हांची माझी व्यक्तिगत गोष्ट, मी रेखाटलेल्या विरामचिन्हांच्या चित्रांसह.
दुसरी गोष्ट म्हणजे ध्यान धारणा. फार मोजके लोक ध्यान धारण करतात. सर्व मान्य ध्यान धारणा म्हणजे पद्मासनात/सुखासनात ताठ बसून, दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर सरळ ठेवून, डोळे मिटून मन/चित्त  एकाग्र करणे. मी निरनिराळ्या वेळी, विविध व्यक्तींच्या सांगण्यावरून, ही ध्यान धारणेची पद्धत आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, अगदी आजच्या अत्याधुनिक मृदू उपकरणांच्या(app) मदतीने सुद्धा प्रयत्न केला. तथापि मला ते शक्य झाले नाही. किंबहुना मला या मार्गाने ध्यान धारणा जमत नाही, याची पूर्णपणे जाणीव झाली. तरीही मी ध्यान धारणा करते, दररोज नाही, तरीही नियमितपणे. ही ध्यान धारणा मी माझ्या व्यक्तिगत पद्धतीने करते, ती पद्धत म्हणजे चित्रं रेखाटन आणि लेखन. थोडक्यात आनंदी पाऊस (www.anandipaus.com) म्हणजे माझ्या ध्यान धारणेचे फलित किंवा माझ्या ध्यान धारणेचे मूर्त रूप! 
               मी काही थोर चित्रकार वगैरे नाही. तथापि मला चित्रं रेखाटायला, त्यात रंग भरायला मनापासून आवडते. ह्या चित्रांचे विषय, प्रेरणा मला अगदी कुठूनही मिळते. कुठे काही आकार बघितला, कुठे छानसे रंग, रंगसंगती पाहिली आणि मला ती मनापासून आवडली तर, ती माझ्या मनात, हृदयात, मेंदूत कायमची घर करून राहाते. त्यातूनच माझी स्वतःची एखादी कलाकृती किंवा कलाकृती मालिका साकारते. कधी अगदी लगेचच, तर कधी थोड्या कालावधीत, तर कधी खूप कालावधी नंतर. 
               अशीच एकदा मी घरी गेलेले. मी झोपत असलेल्या गादीवर गुलाबी रंगाच्या छटेची चादर होती. त्या चादरीवर स्वल्प विरामाच्या आकारांची नक्षी होती/आहे. बऱ्याच दिवसांपासून मी ती बघत होते. मला तो आकार फारच आवडला होता आणि त्यावर काहीतरी काम करण्याची मनापासून इच्छा होती. तथापि माझ्याकडून काहीही झाले नव्हते. गेल्या वेळी गेले तेव्हा सरळ त्या आकाराचे एक छायाचित्रच टिपून आणले. तसेच  स्टेशनरीच्या दुकानात मी नेहमीच जात असते, या ना त्या कारणाने. मध्यंतरी गेले तेव्हा 'खुण करण्याचे पेन' (marker) नवीनच आलेले. दुकानदार भैय्या म्हणाले, लेके जावो अच्छा है. रंग नेहमीसारखे भडक नव्हते, छान हलक्या, फिकट छटेचे(pestal shades) होते. मग त्यातील तीन रंग निवडून आणले. 
                माझा बुद्धिमान भ्रमणध्वनी बघतांना हे छायाचित्र वरचेवर नजरेसमोर येत होते. एके दिवशी तो आकार तशाच्या तसा कागदावर काढला, त्यात नवीनच आणलेल्या खुण करण्याच्या पेनने रंग भरले, काही नक्षी काढण्याचा प्रयत्न केला. तथापि ते रेखाटन माझ्या मनाला भावले नाही, त्यामुळे एक अस्वस्थता आली. काय करावे, कसे रेखाटावे या विचारांनी झपाटून गेल्या सारखे झाले. आणि एक-दोन दिवसातच एका नवीन मालिकेलाच सुरुवात झाली. ते खुण करण्याचे पेन न वापरता रंगीत पेन्सिल्स वापरल्या, फक्त तेच तीन रंग वापरायचे अशी अटच घातली स्वतःला. एक एक करत सगळी विराम चिन्हं कागदावर साकार झाली, मग वाटले पूर्ण विराम म्हणजे जरी फक्त एक वर्तुळ असले तरी तो हवाच, त्याशिवाय ही मालिका पूर्ण होवूच शकत नाही. मग तोही साकारला!
मालिका पूर्ण झाली, मला अगदी मनापसून आवडली. मन, हृदय मेंदू एका तृप्त आनंदाने भरून गेलं. वाटलं, हा तृप्त आनंद, आनंदी पावसाच्या माध्यमातून, आपण साऱ्या वाचकांसोबत वाटावा, अनुभवावा, तरच तो पूर्णत्वास जाईल. पुढच्या क्षणी वाटले या मालिके सोबतच, या मालिकेच्या निर्मितीची गोष्ट सुद्धा लिहावी आणि चित्रं-मालिका तिच्या गोष्टीसह सादर करावी आपल्या सगळ्यांपुढे. मग काय, लगेचच लेखन सुरु केले.  
ही सगळी विराम चिन्हं चित्रं रुपात रेखाटली खरी, तथापि ती रेखाटणे चित्रं रुपात न राहता, चैतन्यमयीच होऊन गेली. माझ्याशी संवाद साधू लागली. माझ्या मनात त्यांच्या बद्दलच्या विविध भावना, आठवणी जीवंत झाल्या.
                    या सगळ्या विराम चिन्हांवर एक छानशी कविता वाचायला मिळाली. ती सुद्धा देत आहे.


 नाकावरती 'स्वल्पविरामी'
शोभे तव नथनी ।

'काना' काना गुंफुनी माला
खुलवी तुज कामिनी ।

'वेलांटी'चा पदर शोभे
तुझिया माथ्याला ।

'मात्रां'चा मग सुवर्णचाफा
वेणीवर माळिला ।

'उद्गारांचा' तो गे छल्ला
लटके कमरेला ।

'अवतरणां'च्या बटा
मनोहर भावती चेहऱ्याला ।

'उ'काराचे पैंजण झुमझुम
पदकमलांच्यावरती ।

'पूर्णविरामी'
तिलोत्तम तो
शोभे गालावरती ।।
 Ref:-wikipedia





स्वल्प विराम

शालेय जीवनात मला सुरवातीची बरीच वर्ष लिखाण करायला आवडतं नसे. अगदी लिहिणे गरजेचेच असेल, तेव्हढेच लिहित असे मी. जेव्हढे कमी लिहावे लागे तेव्हढे चांगले, असे वाटे. 'आणि' शब्द अतिशय नावडीचा. एकतर दोन अक्षर, त्यात त्या 'ण' ला पहिली वेलांटी. मला तेव्हा पहिली वेलांटी अजिबात आवडत नसे, असे वाटे सगळ्या अक्षरांना दुसरीच वेलांटी हवी आणि पहिलाच उकार असावा. त्यामुळे 'आणि' च्या ऐवजी स्वल्प विराम द्यायला फार आवडे. त्या अर्थाने हा आवडीचा, तेव्हा.
स्वल्पविरामाचे रेखाटन करायला घेतले तेव्हा त्याचा आकारही खूप आवडला. त्याचे रेखाटन सुद्धा छान झाले, त्यातील आकार, रंगसंगती सारेच अतिशय सुरेख वाटले!



उद्गारवाचक चिन्ह

हे म्हणजे वेळ-प्रसंगानुसार आवडणारे किंवा नावडणारे. म्हणजे एखाद्या छान, आनंद वाक्यानंतर आले असेल तर आवडणारे. याउलट जर हे चिन्ह आलेले असेल तर, नकोसे वाटे, वाटते. आकारही छान या चिन्हाचा. 




अवतरण चिन्ह 
ह्याचे दोन प्रकार एकेरी आणि दुहेरी अवतरण चिन्हं. ह्याचे सुद्धा उद्गारवाचक चिन्हासाराखेच. अवतरण चिन्हात काय वाक्य आहे, त्यावरून ठरणार हे आवडते की नावडते. दुसरे कारण म्हणजे, परीक्षेत प्रश्न येत असे, खालील वाक्य कुणी, कोणास, केव्हा म्हटले संदर्भासहित सांगा. अशावेळी अवतरण चिन्हात असलेले वाक्य, मला नेमकेपणे आठवणारे वाक्य असेल, तर मग हे अवतरण चिन्हं  खूप आवडे. तसे नसेल तर मग मात्र, त्याचा राग येत असे. बाकी फक्त चिन्हं म्हणून मात्र नेहमीच आवडे, आवडते. त्यातल्या त्यात दुहेरी अवतरण चिन्हं तर खूपच आवडीचे. याच्या रेखाटना बाबत बोलायचे झाले तर, ते खूपच गोड झालेय. 



अर्धविराम 
या चिन्हाचा अर्थ समजत असे, तथापि ते नक्की कुठे वापरायचे ते मात्र नक्की कळत नसे. बाकी तशी फारशी आवड नावड नाही सांगता येत याबद्दल. रेखाटन मात्र अगदी मनापासून आवडलेय, त्यातील नक्षीकाम आणि रंगसंगती दोन्हीही!


प्रश्नचिन्ह
कायमच आणि सगळ्यांनाच छळणारे. अगदी शालेय जीवनापासून ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत भीती असलेले विराम चिन्ह. तरीही मला सारखेच प्रश्न पडतात. मी सारखे याला नी त्याला विचारत असते, मग हे प्रश्न. या माझ्या स्वभावामुळे माझ्या एका स्नेह्यांनी माझे नामकरणच केले. माझे नाव ठेवले "प्रश्नाली". इतके करूनच ते थांबले नाहीत. ते कलाकार(चित्रकार) आहेत. मग त्यांनी माझ्या या नावाचे छानसे ग्राफिक्स करून दिले मला. त्यात त्यांनी प्रश्न चिन्हाचा सुंदर आणि कलात्मक पद्धतीने वापर करून, वेगवेगळ्या रंगसंगतीत पर्याय सुद्धा दिले! काय भारी वाटले! त्याच्या सुद्धा प्रतिमा देत आहे खाली!








लेकीने लगेचच त्याचे चल चित्रं तयार केले! 



पूर्णविराम 
सरते शेवटी, पूर्णविराम. हा मात्र कायमच आवडीचा. वाक्य संपल्यावर येतो, त्यामुळे क्षणिक का होईना विश्रांती मिळाल्यासारखे वाटते. मानसिक विश्रांती तर मिळतेच. चला एक वाक्य संपले, एक परिच्छेद संपला, सरते शेवटी एखादे उत्तर लिहून पूर्ण किंवा एक धड्याची सगळी पश्नोत्तर लिहून झाली एकदाची. एकदम बरं वाटे. या सगळ्या सुखद संवेदनेसारखेच, अगदी छान सुखद रेखाटन झालेय! 
या पूर्णविरामा बरोबरच या चित्रं-लेखालाही इथे पूर्णविराम देते! 

आनंदी पाऊस
(काही अनुभवलेलं...)
१७ मे २०२४ 

Comments

  1. Mm , marathi shabd nvyane wachle
    Tuzi chitra kala
    Apratim

    ReplyDelete
  2. Creative👌🏻
    Now I m inspired to draw n paint something

    ReplyDelete
  3. वावा सुंदर लिखाण 👌
    तुझा हा चित्ररूपी विरामचिन्हे नुसते चित्रे न राहता त्यात वेगवेगळ्या भावना जाणवतात.
    विशेष करून पुर्णविराम हा तर मनाला एक प्रकारची शांतता देतो 👌👌

    ReplyDelete
  4. 😊vershali avtaran chinhe yaa vegle subject waril lekh aani saglech awtaran chinhachi chitre aani rangsabgti khoopch sunder zalet 👌👍
    Asech navin vishya waril lekh wachayla aawdel

    ReplyDelete
  5. डॉ मनीषMay 18, 2024 8:55 pm

    Chchan aahe viram.
    Aata aaram viram karto

    ReplyDelete
  6. मंदा चौधरीMay 18, 2024 9:56 pm

    तुझी आजची चित्र मालिका आणि लेख खूप छान जमले आहे.

    ReplyDelete
  7. खूप सुंदर विरामचिन्हे. वेगळा विषय, वेगळा विचार 👍

    ReplyDelete
  8. Very creative....superb👌👌

    ReplyDelete
  9. Vegla vishy vachayla khup chan vatle.

    ReplyDelete
  10. अर्चनाMay 22, 2024 6:25 am

    सुंदर सुंदर विराम चिन्हं....😍👌🏻

    ReplyDelete
  11. Purna viraam was 👌👌
    Sunrise on it 😌

    ReplyDelete
  12. अप्रतिम.
    विराम चिन्ह हा लेखाचा विषय होऊ शकतो हा विचार ही मनात आला नव्हता.
    सुंदर रेखाटन आणि रंग संगती आणि त्याबद्दल ची विचार सरशी!!!

    ReplyDelete
  13. प्रा ए पी पाटीलMay 29, 2024 6:42 am

    चित्ररूपातील विरामचिन्हे तू खरंच चैतन्यमय करून टाकली आहेस. विषय कुठलाही असो, त्यात झोकून देण्याची तुझी जी प्रवृत्ती आहे, ज्याला तू ध्यानधारणा म्हणतेस, ती खरंच वाखाणण्याजोगी आहे. आता विरामचिन्हांचेच बघ ना. हा काही चित्ररूपात किंवा त्यांच्याविषयी भावना प्रकट करण्याचा विषय नाही, परंतु तोही विषय किती कलात्मक पद्धतीने आणि सहज रीतीने तू रेखाटला आहेस, यातच तुझी ध्यानधारणा सफल झाली, असे म्हणावे लागेल.
    तसं म्हटलं तर मलाही लहानपणी व्याकरण हा विषय इतर मुलांप्रमाणे किचकटच वाटायचा. प्रथमा, द्वितीया, तृतीया इत्यादी.... त्यांचे प्रत्यय स,ला,ते,स,ला ना,ते .... वगैरे पाठ करून कंटाळा यायचा. अर्थात त्यावेळची शिक्षण पद्धतीही तशीच होती.
    आता तुझ्या आनंदी पावसात हीच विरामचिन्हे न्हाऊन निघाली आहेत आणि त्यांना नवीन चैतन्य प्राप्त झाले आहे. खरंच ही चिन्हे जर नसती तर लिखाण आणि वाचन खूपच कंटाळवाणे झाले असते, तसेच अर्थाचा अनर्थ व्हायला वेळ लागला नसता.
    विरामचिन्हांचा भावनांशी संबंध जोडण्याचा तुझा जो प्रयत्न आहे, तो खूपच गमतीशीर आहे. स्वल्पविराम अथवा अर्धविराम प्रवासाला निघालेल्या व्यक्तीचे मधून मधून थांबायचे टप्पे दाखवितो, तर पूर्णविराम म्हणजे त्या व्यक्तीची मुक्कामाची जागा! पुढच्या प्रवासाला निघण्यापूर्वी थोडी विश्रांती घ्या असे तो म्हणतो.
    अवतरण चिन्ह म्हणजे तुमच्या जीवनातील अति महत्त्वाचे टप्पे तर प्रश्नचिन्ह म्हणजे जीवनातील समस्या.
    मला आवडते ते उद्गारवाचक चिन्ह! दुःखाच्या प्रसंगी काढलेला "अरेरे" असो, आनंदाच्या वेळी निघालेला "अहाहा"असा शब्द असो, अति भव्य असे पाहताना सहाजिकच निघालेला "अबब" असो, एखाद्या रमणीच्या तोंडून निघालेला "अय्या" किंवा "इश्श्य" असो, आजकाल बर्याच ठिकाणी "ओह", "आऊच", "वाऊ" अशा शब्दांनी अतिक्रमण केले आहे, आपले हे उद्गारवाचक चिन्ह नेहमी आपल्या सेवेला तत्पर असते. त्याला भारतीय अथवा पाश्चात्य संस्कृतीशी काही देणे घेणे नाही. मदतीला येणार म्हणजे येणारच!
    असो, पुनश्च एकदा तुझ्या कलात्मक सृजनशीलतेला अभिवादन. धन्यवाद🤗

    ReplyDelete
  14. Ek number..खूप कमाल हो...आज विराम चिन्हांचा"चित्रांम' मधील "Transformation "आपल्या "Creative भिंगातून"पाहताना माला ..माझा चित्रं पाहण्याचा रस वाढतोय... प्रत्येक चित्रे ही माला वेगळा बोध दर्शवितात.. बोलकी वाटतात..अवतार चिन्हं माला सगळ्यात जास्त आवडलं..एक सममिती आणि संवादात्मक वाटतंय....जणू emoji expressions...अर्धविराम - नथ किंवा अंबाडा तर प्रश्नचिन्ह हे माला "मँशमेलोच्या लवचिक टाँफीसारखे भासे मज...पूर्णविराम sunset -sunrise चे Scene -चक्र वाटे मज...- through my लेन्स संजिता

    ReplyDelete
  15. khup masta lihile ahe
    wegala Vishay...
    Majja Ali wachun😊🙏🏼

    ReplyDelete
  16. चित्र रुपी विरामचिन्हे खूप छान पद्धतीने वर्षा तू रेखाटली आहेस.या चिन्हांच्या पाठीमागे असलेल्या भावना खूप छान रीतीने मांडल्या आहेस.लेख आणि काढलेली सगळी चित्रं ek no .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...