Skip to main content

आनंदी सोहळा-२ (पूर्वार्ध )

 आनंदी सोहळा-२

(पूर्वार्ध )


🌺🌺🌺

आजच्या या आनंदी सोहोळ्यात आपल्या सगळ्यांचे 

अगदी प्रेमपूर्वक आणि आदरपूर्वक स्वागत !

त्रिवार स्वागत !

💐💐💐


तू चालवलेल्या प्रयत्नाला शास्त्रीय भाषेत "इन्ट्रोव्हर्टेड कल्चर" (introverted culture) म्हणजे अंतर्मुख करायला लावणारी संस्कृती म्हणतात. म्हणजेच दार बंद केल्यावर सुरु होणारी संस्कृती, स्त्रिया, मुलं, चलन वलन, स्वयंपाक-पाणी, पंगती, त्यातील पदार्थ, ते कसे बनविले जातात वगैरे वगैरे.

सध्या मानवाची कुटुंब विभाजनाची प्रक्रिया, अगदी एकेकट्या राहण्याच्या शेवटच्या टोकापर्यंत वाटचाल सुरु आहे. तू , हरवत चाललेली संस्कृती, निरनिराळ्या प्रकारच्या निमित्ताने आनंदाचे रूप घेऊन, तप्त झालेल्या पृथ्वीला/समाजाला आनंद देण्याचा प्रयत्न करतेस. तुझ्या आनंदी पावसाचा हा आत्मा आहे. 
आनंदी पाऊस केव्हा-जेव्हा सगळे तृषार्त झालेले असतात, वैशाख वणवा पेटलेला असतो, सगळेच पावसाची आतुरतेने वाट बघत असतात ..... 
                गडद निळे गडद निळे जलद भरूनी आले ..... 
                                  ...... तेव्हा तो पाऊस आनंदी असतो. 
असे केव्हा होते, तर जेव्हा असे passion projects होतात. 
passion म्हणजे मनापासून आवड, ओढ! 
हा मुद्दा सरांनी भेळेचा लेख/प्रसंग उदाहरणादाखल घेऊन स्पष्ट केला. 
सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ. तो करण्याचा उत्साह आणि उत्सुकता असते. आज संध्याकाळी सगळ्यांना पोटभर भेळ मिळणार आहे, या आनंदाची प्रतीक्षा आणि झाल्यावर तुझा पडणारा आनंदी पाऊस!
प्रत्येकाला या कामात आपला थोडा हिस्सा असावा असे वाटते. 
यातून cohesive spirit अनुभवायला मिळतो. 
अशा वेळेला कुणीही म्हणत नाही भेळ चांगली झाली नाही. स्वच्छ मनाची माणसं कधीही खोटं बोलतं नाहीत. त्यादिवशी चांगली झाली नाही तरी ठीक आहे, पुन्हा चांगली होईल या आशेवर त्या passion event ला जीवंत ठेवले जाते. 
                 नित्य अनुभव करूनही जीवंत राहतो त्याला passion प्रोजेक्ट म्हणतात!
बंब, पाटे-वरवंटे वगैरे हे सगळे dying culture. ते तू चित्रांसह जीवंत केलेस. 
यातून शिकवण काय तर , away from the madding crowd. वरून चांगल्या दिसणाऱ्या पदार्थापासून दूर जाऊ या, पाणीपुरी घरीच बनवू या. 
म्हणजे त्या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारं cohesive spirit!
भेळ खाणारे structure भेळेशी अगदी एकरूप झालेलं असतं. 
सगळे भेळेच्या भोवताली बसूनच  सुरुवात करत असू . म्हणजेच काय तर.... 
                          सह नाववतु l सह नौ भुनक्तु l सह वीर्यम  करवावहै l 
या सगळ्यात.....घराकडे पुन्हा चला हा आर्त टाहो आहे. 
आपण एखादा प्रसंग करू या...... पैशाच्या मागे ते चार दिवस लागू नका.....केव्हा तरी ठरवा....आपण मिळून राहू या.......मिळून चटणी भाकरी खाऊ या....आनंद मिळून वाटून घेऊ या. 
हे सगळे dying culture/intangible heritage म्हणजेच अदृश्य वारसा आहे. 

जगातील कुठलाही देश आपली संस्कृती सहजसहजी सोडत नसतो, but we indian have forgotten our great culture....... 
chasing the mirage....... 

तुझे प्रयत्न चालू ठेव. आपली ज्याच्यावर बैठक आहे, जो आपल्या दैनंदिन कार्यक्रमाचा भाग आहे, तो नित्य प्रामाणिकपणे करण्यामध्ये जी एक प्रकारची सात्विकता नांदते, तशी सात्विकता कुठेही शोधून सापडत नसते. याला नैमित्तिक कर्म म्हणतात. 

तू लिहिलेस हे खरे, त्याची गरज आहे हे ही खरे. पण अनेक स्त्रियांनी असे लिहिले तर सुरेख अशा प्रकारचा संस्कृतीत समागम होऊ शकतो. 
💐
माझे गुरु 
आदरणीय ऋषितुल्य डॉ रा श्री मोरवंचीकर 

खरंतरं मी आज काहीही लिहिणार नाही, असे ठरविले होते. पण दोन अपरिहार्य कारणांमुळे मला लिहावे लागत आहे. पहिले आणि सगळ्यात महत्वाचे कारण-आजच्या या सोहळ्याची सुरुवात माझे गुरु आदरणीय ऋषीतुल्य डॉ. रा. श्री. मोरवंचीकर यांच्या शब्दांनी करायची माझ्या मनात होते. पण अलीकडे ते लिखाण वगैरे पासून लांब आहेत. पण त्यांनी माझ्या या लिखाणाबद्दल बोलावे/सांगावे, अशी माझी इच्छा होती. मग त्यांनी फोन करून मला सरळ काही मुद्दे सांगितले, त्या सगळ्यांचे अगदी सविस्तर स्पष्टीकरण सुद्धा केले. आणि ते सगळे मला माझ्या शब्दात लिहायला सांगितले. त्यामुळे मला समजले तसे आणि जमले तसे लिहिले आहे. शक्यतो त्यांचेच सगळे शब्द वापरले आहेत. थोड्या वेळात ते सगळे लिहिणे म्हणजे खूपच मोठ्ठे आव्हान होते माझ्या समोर. एकदा वाटले थोडा वेळ घेऊन निवांत लिहावे. पण आदरणीय चंद्रमोहन कुलकर्णी सरांची शिकवण समोर आली, "जे काय आहे ते आत्ताच होते, नंतर काहीही होत नाही. " हे वाक्य कायमच माझ्या डोक्यात असतेच. नंतर करू असे म्हणून आपण ती गोष्ट टाळतच असतो. त्यामुळे लगेचच जसे जमले तसे लिहून काढले. 

                       तसेच त्यांनी हे मुद्धे सांगताना सांगितले होते, तुला जमेल तसे लिही किंवा कोणा कडून लिहून घेतले तर चालेल आणि नाहीच लिहिले तरी चालेल. फक्त माझे आशीर्वाद आणि शुभेच्छा आहेत, एव्हढे लिहिले तरी चालेल! लिहून झाल्यावर मला दाखवायची गरज नाही. तुला योग्य वाटले तर प्रकशित करून टाक, कारण ... 

                             "भावनांत कुठे correction असते का ?, शुद्धलेखनात असते "

                        दुसरे असे की, ज्या वाचकांच्या मी प्रत्यक्ष संपर्कात आहे, त्यापैकी काहींना माझ्या या आजच्या सोहोळ्या बद्दल सांगितले आणि यात "वाचक लिहितात" हे सदर सादर करण्याचा माझा मानस आहे, असे कळविले. सगळ्यांचाच अगदी भरभरून प्रतिसाद मिळाला. बऱ्याच वाचकांनी त्यांची मते लिहून पाठविली. ती सगळीच इथे प्रकाशीत करणार आहे. पण ती सगळीच इथे एकाच लेखात प्रकाशित केली, तर हा लेख खूपच मोठ्ठा झाला असता. त्यामुळे याचे दोन भागात प्रकाशन करावे लागत आहे. दुसरा गमतीचा भाग म्हणजे सध्याची परिस्थिती आणि नियम. ते पण पाळलेच पाहिजे ना? सोहोळा आहे, फार गर्दी होता कामा नये 😆! मग दोन दिवस साजरा करू या हा सोहळा, मर्यादित उपस्थितीत 🤩! म्हणजे नियम पाळल्यासारखेही होईल आणि वाचताना लांबलचक लेख वाचायचा कंटाळाही येणार नाही! 

परत एकदा सगळ्यांचे सप्रेम स्वागत!

🙏🙏🙏

🌷🌷🌷



💧💦
नमस्कार ,
सर्वात प्रथम आपलं मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि विशेष कौतुक . विशेष कौतुक अश्यासाठी की आपण 'चौधरी सदन' मध्ये वयाच्या अकराव्या वर्षापर्यंतच राहिलेल्या असूनही आपण तेथील आठवणींचा उजाळा फारच सहृदयतेने आणि सविस्तर मांडलेला आहे . एखाद्या अतिशय साध्या पण जिव्हाळ्याच्या विषयावर किती उत्कृष्ट लेख तयार होऊन तत्कालीन संस्कार पुढच्या पिढीत कसे संक्रमित होऊ शकतात याच हे मूर्तिमंत उदाहरणं आहे . 
आपण आर्किटेक्ट असल्याचा १००% फायदा आपल्याला लेख लिहितांना दिसतो . जस की , एखादी इमारत कशी बांधावी की जेणेकरून आपल्याला हव्या असलेल्या सुखसोयी तर त्यात असायलाच हव्यात पण त्याच बरोबर बाह्य रूपही आकर्षक व मनोहर हवं की पाहणाऱ्याला आनंद मिळायला हवा . अगदी तसंच आपण लेख लिहितांना शब्दांची रचना व प्रसंगोचित उत्कृष्ट फोटो टाकून आपण प्रसंगांची सत्यता दाखवून दिलेली आहे . ही रचना साहित्यक दृष्ट्या पाहता अतिशय सुंदर , आकर्षक व सत्य अनुभव अशा शब्द सुमनांनी भाव भावनांची गुंफण तयार केली आहे की , आपण स्वतः त्या विश्वात जाऊन आनंद जसा घेत आहात तसंच वाचकही त्याकाळातील त्या गोष्टींचा आनंद घेत आहेत व भविष्यातही घेत राहतील कारण असाच आनंद मी पण घेतला . 
मी आपण बनविलेले सर्व प्रकारचे चमचमीत चाट खाल्लेत . अगदी भेळ , पाणीपुरी , कचोरी सुद्धा . त्याच बरोबर नागपंचमीचे दिवे , तांदळाची खीर , रविवार सकाळचं भरीत , टमाटम फुगलेली भाकरी , कोशिंबीर , साय लोणी , तूप , बेरी अशा आपण खाल्लेले सर्व पदार्थ मी पण खाल्लेत . कारण आपण ज्या पद्धतीने ते सर्व बनविण्याचं लिखाण केले आहे ते वाचकांच्या तोंडात नुसतं पाणीच आणत नाही तर खाल्ल्याचं समाधानही देते . 
दिवाळीत शेजारी पाजारी , नातेवाईक व मित्रमंडळी यांच्याकडून आलेल्या फराळातील शेव , चिवडा , पापडी , भेळ तयार करण्यासाठी वापरणं आणि ती ही पोटभर मिळण्यासाठी आईजवळच बसणं हे जे सत्य कथन केलं आहे ते मनाला खूप भावलं आणि त्याला गोपाळ काल्याची उपमा देऊन , त्याला अन्न न ठेवता त्याचा प्रसाद बनवून आपलं साहित्य अध्यात्माच्या एका उंचीवर कसं नेता येतं , हे आपण आपसूक दाखवून दिलेलं आहे . 
सोमवारच्या कहाणीतील सोमवारचा उपवास व त्या दिवशी सक्तीने एक वेळेचं जेवण नाही म्हणजे नाही , ही गोष्ट काटेकोरपणे सर्व कुटुंबीयांनी पाळणं आणि ते ही स्वर्गीय लाल बहादूर शास्त्रींनीं सैन्यातील जवानांसाठी हे देशातील सर्व लोकांनी करायचं आहे , असं आवाहन केल्यामुळे आपल्या कुटुंबीयांची देशासाठीची जबाबदारी पाडतांनाची जाज्वल्य देशभक्ती दिसल्याशिवाय राहत नाही . ही गोष्ट हृदयात खोलवर जाऊन बसते . 
लाकडी गल्ला - माझा वारसा यामध्ये दोन्ही काकूंनी जपून ठेवलेल्या वस्तूंमुळे अप्रत्यक्षपणे पूर्वजांची भेट घडण्याची त्यांचा सहवास मिळण्याची आणि त्यांचा स्पर्श अनुभवण्याची एक दुर्मिळ आणि अशक्य अशी संधी प्राप्त झाल्याचा आनंद आपण मिळवला . पंजोबांच्या सहवासातही जाण्याचा आनंद मिळवला . हे जे सत्य प्रसंग आहेत त्यातून वाचकही त्यांच्या त्यांच्या भूतकाळात शिरून हा आनंद शोधायचा प्रयत्न केल्याशिवाय रहात नाहीत . गॅलरीतून पाहिलेल्या मिरवणूका व त्यांचं यथार्थ वर्णन नक्कीच त्या काळात घेऊन जाऊन मनोरंजन करतं . 
वरील सर्व ब्लॉग मधून मला भावलं ते आपलं सूक्ष्म निरीक्षण , आपली एकपाठी स्मरणशक्ती , आपण नातेवाईकांबरोबर ठेवलेले जिव्हाळ्याचे संबंध , आपली आनंद शोधून तो इतरांना वाटण्याची कला आणि ते मांडण्याची पद्धत . विषयाशी निगडीत आपण टाकलेले अप्रतिम फोटो पाहता हे ब्लॉग तयार करतांना आपण किती मेहनत/ कष्ट घेतले असावे याची कल्पना येते . या कष्टामुळेच आपणाला मिळणाऱ्या आनंदाबरोबर वाचकांना जो आनंद मिळणार आहे त्या वाचकांच्या वतीने मी पुन्हा आपले अभिनंदन करतो व पुढच्या लिखाणाच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो . 
धन्यवाद !
💐
प्रा . व. पु. होले 
एक थोर लेखक , विचारवंत आणि प्राध्यापक 
सावदा 
मो. नं. ९४०३८२०००७

💧💦
खर तर ईतक्या सगळ्या आठवणि तुला आहे आणि ईतक्या लहानपणीच्या हेच आश्चर्य वाटते. किती बारीक निरीक्षण ईतक्या लहानपणी तू करीत होती ह्याचे खरेच नवल वाटते. कपाटातील कोणत्या कप्प्यात काय होते. कोणत्या रंगाच्या साड्या होत्या. तसे तर बिबडे करायच्या वेळेला तुमच्या कडूनच बरेचसे काम करून घेत असे मी. वाळणाच्या वेळीसुध्दा तुम्हा मुलींचा कायमच मदतीचा हात असायचा. आईस्क्रीम करायच्या वेळी पाटचे हॅन्डल फीरवून आईस्क्रीम तयार व करताना बर्फ खेळण्याची आणि खाण्याची धमाल. डबा पार्टीला जाताना सामान घेउन पायी पंपीगला जाताना पारंब्या खेळत खेळत जाण्याची मजा अशा कितीतरी गोष्टींचा गोषवारा घेउन लेख लिहीण्याची हातोटी छान साधली आहे!
💐
आमची मम्मी! 
हीच्याच हौशी आणि सतत कार्यशीलतेमुळे माझा ब्लॉग अनंत विषयांनी बहराला आहे आणि याही पुढे बहरत राहील!


💧💦

आता पर्यंत प्रकाशीत झालेल्या लेखा बद्दल लिहिण्या सारखे बरेच आहे . पण त्यातल्या त्यात सर्व प्रथम एवढ्या बारीक सारिक वस्तु, प्रसंग व त्यातून मिळविलेले मनसमाधान आणि आनंद याची केलेल्या आठवणिचा गोषवारा ईतक्या वर्षा नंतर जसाचा तसे शब्दांकनात ऊतरवले याचच कौतुक किती  आणि कसं करावं यालाच शब्द सापडत नाही. तसेच सर्व प्रसंग अगदी काल गणणेनुसार मांडले गेलेले आहेत. गॅलरी मधील बाकावरील गमती जमती,गच्चीवरील घडलेल्या घडामोडींचा आढावा, आईस्क्रीम ची पार्टी, ती पण पाँटमधे तयार केलेला, जुन्या घरातील वस्तु,मूळ गावाच्या घरात साडलेल्या वस्तुंचे वर्णन आणि किती नि काय, सर्व वस्तुंचे फोटो सहित वर्णन. सर्व फोटो मिळविण्याची किमया, जुन्या पुरातन वस्तु बद्दल असलेली आवड आणि आस्था. सर्वच कौतुकास्पद आहे !
💐
आमचे दा !
यांचे विविध विषयांवरील ज्ञानचा आणि स्मरणशक्तीचा भक्कम आधार !

💧💦
आनंदी पाऊस.....
एक अविस्मरणीय प्रवास, जो सतत बरसत रहावा, हवाहवासा..
आनंदी पाऊस च्या निमित्ताने परत एकदा मराठी वाचनास सुरुवात झाली . मनापासून आवडणारा आणि दर शुक्रवारची मनापासून वाट पहायला लावणारा लेख. केव्हा एकदा शुक्रवार येत़ो आणि नविन लेख वाचायला मिळतो असे होऊन जाते.
आनंदी पाऊस च्या निमित्ताने दर आठवड्यात पुन्हा एकदा बालपण आणि बालपणाच्या आठवणी मध्ये रममाण होता येते. तेव्हा च्या गमतीजमती, तिथले वातावरण, एकत्र कुटुंब असल्याने खेळीमेळीचे वातावरण, अगदी हवे हवेसे वाटते. तिथे राहात असलेले शेजारी, मैत्रीणी यामुळे दिवस कसा जायचा ते कळतही नव्हते.
त्यात लेखिकेने अगदी बारीक सारीक तपशील, क्षण, प्रसंग, आठवणी समरसतेने, तन्मयतेने आणि स्वतःचे स्व ओतुन निर्माण केलेले लेखन, ओघवती भाषा आणि तंतोतंत द्रुश्य डोळ्यासमोर उभे करण्याची क्षमता यामुळे एक वेगळेच समाधान आणि तृप्ती मिळत असते. प्रत्येक लेख व त्यानुसार असलेले छायाचित्रे यामुळे लेख उठावदार तर होतोच शिवाय परत परत वाचण्याची इच्छा उत्पन्न होत राहते!
💐
आमची ताई!
नावच पुरेसे आहे 


💧💦
सराईत अशा लेखनाची कुठलीही पार्श्वभूमी नसतांना तू आनंदी पाऊस ही मालिका सातत्याने दोन वर्ष अगदी नियमित लिहीत आहेस . यावरूनच तुझी प्रतिभा आणि चिकाटी दिसून येते . सुंदर लेखनाची इच्छा पूर्ण झाली असतांना तुला किती आनंद झाला असेल याची मला पूर्ण कल्पना आहे . निलेशने स्टेटस वर लिंक पाठविल्यामुळे 'आनंदी पावसात' चिंब भिजण्याचा आम्ही मनमुराद आनंद अनुभवत आहोत . लहानपणापासूनचे बारीक सारीक प्रसंग ही इतक्या वर्षानंतर आठवणे ही एक प्रकारे तुला प्राप्त झालेली दैवी देणगीच आहे . तिचा उपयोग तू या निमित्ताने केलास आणि त्यात आम्हालाही सहभागी करून घेतलेस याबद्दल मनापासून धन्यवाद ! 
         आपले लेखन म्हणजे स्वतः चे जणू अपत्यच असते . त्यावर आपले प्रेम असणे स्वाभाविक आहे . पण त्यावरचे वाचकांचे अभिप्राय किती आणि कुणाकुणाचे आहेत यावर लेखनाचा दर्जा ठरत असतो . या कसोटीवरही तुझे लेखन खरे उतरले आहे हे विशेष ! असे वैशिट्य म्हणजे काही योगायोग नाही . ते प्राप्त करून घ्यायलाही वाङ्मयाचा व्यासंग , अनुभव संपन्नता , सूक्ष्म निरीक्षण , धारदार स्मरणशक्ती आणि जिद्द यांची आवश्यकता असते . हे गुण तुझ्या ठिकाणी वास करत आहेत . म्हणूनच भाषा ओघवती आणि लिखाणात जिवंतपणा आला आहे . आनंदी पाऊस सरल्यावरही अशीच किंबहुना याहूनही सरस अशी वाङ्मय सेवा तुझ्या हातून घडत राहो , हीच सदिच्छा ! पुनःश्च अभिनंदन !!!
💐
श्री ए पी पाटील 
माझे कनिष्ठ महाविद्यालयीन गुरु आणि माझे सासरे 
लग्नानंतर यांचा दोघांचे प्रेम आणि भक्कम आधार आहे !

💧💦
लेखिकेला मी अगदी बालपणापासून ओळखतो . चौधरी सदन मी प्रत्यक्ष पाहिले आहे . घरातील अनेक गमती जमती व्यक्त करतांना बारीक सारीक तपशीलवार वर्णन करून , वाचकांनी जरी घर बघितले नसले तरी बघितले जाते . साध्या शब्दात घटना व्यक्त केलेल्या असून , एकत्र कुटुंब पद्धतीतील हे लोक किती खेळीमेळीने राहत होते हे दिसून येते . चालीरीती , सणवार पाळून आनंद घेत होते . या मुली घरातील खेळ , गच्चीवरील खेळ , स्वयंपाकात मदत , गच्चीवरील बाग , पाण्याच्या टाक्या सफाई समूहाने करीत . पाटा-वरवंटा , घरोट , मुसळ , जुने कपाट , कप्पे सर्वकाही लेखिकेने प्रकाशित केले . माझ्या विद्यालयात या विद्यार्थिनी प्राथमिक ते माध्यमिक पर्यंत शिकल्या . त्या खेळाडू , तत्पर आणि हुशार होत्या . 
               वस्तूंची जशी वर्णनं केली , तशीच पापड . बिबडे , लाडू , पाककलेतील बरेच पदार्थ आईसोबत शिकून , तयार करण्याच्या पद्धती वाचकांसमोर ठेवल्या . त्याचा बऱ्याच नवशिक्या मुलींना फायदा होईल याची खात्री आहे . 
                  नव्यापेठेतील घरासमोरून रथ बघणाऱ्या लोकांची गर्दी , देवीची रूपं घेतलेली माणसे , रामलीला करणारे , वासुदेव , गारुडी , फटके मारून घेणारे पोतराज असे विविध लोक आज कालबाह्य आहेत . त्यांची आठवण करून दिली . भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले आहे . 
                   गच्चीवरील जेवण , कोजागिरीचं दूध पिणे कार्यक्रम , पतंग उडविण्याचा आनंद सर्व घरातील लोकांनी कसा घेतला , हे सहज सुलभ वर्णन केले आहे . 
                  प्रत्येक घटनेत समाविष्ट व्यक्ती स्वभाव दर्शन वास्तव केले आहे . लेखिकेने बालपणी पाहिलेल्या वस्तू आज जरी अस्तित्वात नसल्या तरी , वाचन केल्यावर सहज स्पष्ट कल्पना येते . हे लेखनातील कौशल्य खूपच छान आहे . आराम खुर्चीचे वर्णन हुबेहूब आहे . 
                    नगरपालिकेचे महात्मा गांधी उद्यान वर्णन तेथील सहभोजन , भेळ , शेंगदाणे खाण्याचा कार्यक्रम . तसेच पळापळी , लंगडी पळकी  , मामाचं पत्र हरवले , आंधळी कोशिंबीर इ. खेळ मम्मीसोबत खेळणे ही पर्वणीच होती . पक्षांचा किलबिलाट , पक्षांची विष्ठा अंगावर , कपड्यांवर डाग , याचे वास्तव वर्णन आहे . ही सर्व माहिती नवीन पिढीला आनंद देणारीच ठरेल अशी आशा करतो . 
💐
श्री कोल्हे सर 
माझ्या रेषेला वळण लावणारे माझे शालेय गुरु !


💧💦
माझ्या मैत्रीणीने स्वतःचा ब्लॉग सुरु केला ही फारच आनंदाची आणि अभिमानाची घटना होती माझ्यासाठी. तिचे लेख त्यामुळे खूपच उत्सुकतेने वाचले गेले. आयुष्याचा बराच काळ, खरे तर जो सगळ्यात महत्त्वाचा घडणीचा काळ असतो, कॉलेजचा, उत्साहाने भारलेला, रोज नवे अनुभव घेण्याचा आणि नव्या माणसांना भेटण्याचा, त्या काळात आम्ही एकत्र होतो, वेगवेगळ्या संस्कृतीतून आलेल्या आणि एका नव्या जगात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी धडपडणाऱ्या, संपूर्ण विरोधी स्वभावाच्या आम्ही लवकरच अगदी जवळच्या झालो एकमेकींना. आमची कुटुंबे अन आहार विहार नुसतेच ओळखीचे नाही तर प्रिय झाले.
                हा ब्लॉग म्हणजे एका अर्थाने वर्षाचे आत्मचरीत्रच आहे. अन काळाच्या ज्या तुकड्याचे तिने चित्रण केलंय, तो काळ, त्या आठवणी तिच्या तोंडूनच मी अनेकदा ऐकल्या आहेत. पण लेख स्वरुपात त्या वाचताना पुन्हा तिचे बालपणच नव्हे तर आम्ही एकत्र अनुभवलेले आमचे यौवनसुद्धा पुन्हा जिवंत झाले. तिची शैली अगदी सहज, तपशीलवार, गप्पा माराव्यात, अन एकातून दुसरा विषय निघावा अन गप्पा संपूच नयेत अशा प्रकारची आहे. खाद्यपदार्थ,व्यक्ती, रूढी परंपरा, चाली रिती, इमारती आणि परिसर, प्रवास काहीच तिला वर्ज्य नाही.
तिच्या बहारदार वर्णनांनी या आठवणी अगदी जिवंत होतात. तिचे कुटुंबिय ओळखीचे होतात अन खुद्द तिचे व्यक्तिमत्त्व या सगळ्या लेखांमध्ये तुकड्य –तुकड्यांनी आपल्याला सापडत जाते. मग तिला ओळखणारे तर त्यात रंगून जातातच पण कित्येक अनोळखी वाचकही तिचे चाहते होतात यात नवल नाही.
             यात कुठेही आपण काहीतरी महत्त्वाचे सांगतोय असा आव नाही, तरीही तिच्या आनंद दुःखात
आपण सहज सामील होत जातो हे या लेखनाचे मोठेच यश आहे. शिवाय तिच्या आठवणी
वाचताना आपल्या आपल्या आयुष्यातले असेच प्रसंग, आठवणी आठवत राहतात ही दुसरी
छान गोष्ट. छायाचित्रांनी सजलेले हे लेख जळगावच्या एका विशिष्ट संस्कृतीचे, संपूर्ण वर्षातल्या सांस्कृतिक घडामोडींचे, एका संयुक्त कुटुंबातल्या नातेसंबंधांचे, बालपणातल्या साध्यासुध्या निरागस सुख दुःखांचे, रुसव्या फुगव्यांचे मनोज्ञ दर्शन आपल्याला घडवतात अन खरेच पावसाच्या एखाद्या अवखळ सरीत चिंब भिजल्याचे प्रत्यंतर आपल्याला येते. वाचकांना हा आनंदी अनुभव दिल्याबद्दल वर्षा तुझे मनापासून आभार. पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देताना म्हणेन की आता तुझ्या व्यवसायातले, वाचनातले, अनंत छन्दातले अन जगभरच्या प्रवासातले उन पावसाचे क्षण आता इथे मांड. रंगू दे तुझ्या लेखणीतून आयुष्याचे रंग ब्लॉगच्या कोऱ्या कॅनव्हासवर...!
💐
सीमंतिनी 
माझी सख्खी मैत्रीण !
सख्खी मैत्रीण या शब्दांतच सारे आले !


💧💦
तू लिहिलेले अनुभव सिद्ध लिखाण वाचताना तू वर्णन केलेला प्रत्येक क्षण जिवंत झाल्यासारखा वाटतो ..... छायाचित्रांच्या माध्यमातून अधिकच हवाहवासा वाटतो.....प्रत्येक प्रसंगाचे बारकाईने केलेले वर्णन ... वाचणाऱ्याला तत्कालीन घटनेशी समरस करते...तुझ्या लेखांची वेगवेगळी रूपे प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला हवीहवीशी वाटतात... आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी तुझी लेखमाला नक्कीच पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल..दीर्घकाळ जतन केले जाईल.
💐
ज्योती 
माझी एक धाकटी बहीण 
(फक्त वयाने धाकटी आहे , पण माझ्या मनात थोरल्या बहिणी सारखा आदर आहे तिच्या बद्दल !)



💧💦
इवलेसे रोपं लावियले द्वारी , त्याचा वेलू गेला गगना वरी... ही ज्ञानेश्वरांची रचना तुझ्या साहित्यिक प्रवासाला एकदम चपखल बसते. दोन वर्षा पुर्वी तुझ्या साहित्यिक उर्मी ला चालना म्हणुन हा ब्लॉग तू चौधरी सदन ह्या विषयापासून सुरू केलास,आम्हा वाचकांना चौधरी सदन च्या गच्ची पासून वेगवेगळ्या मजल्यांवर सफरीला नेले आणि हा प्रवास वेगवेगळ्या विषयांनी विस्तारला, त्याला आता वर्ष होत आलं आहे. तुझं एकंदरीत ह्या ब्लॉग मध्ये भरपूर लेखन झाल आहे, सगळ्या विषयांचा समाचार ह्या माझ्या अभिप्रायात घ्यायला जमणार नाही,
पण महत्त्वाच्या विषयांचा कौतुक पूर्ण उल्लेख नमूद करतो.
चौधरी सदनाचे वेगवेगळे विषय किंवा प्रसंग म्हणा, ते वाचतांना, आम्हा वाचकांना, विशेष करून जे सीनियर आहेत आणि ज्यानी एकत्र कुटुंब पद्धत बघितली आहे, त्यांना अगदी
भावणारे होते व तुझ्या बरोबर आम्हाला पण आमच लहानपण अगदी प्रसंगा प्रसंगात अनुभवता आलं. त्यात तुझी लेखन शैली एकदम बोलकी आणि खेळीमेळीची असल्याने वाचक तुझ्या लेखनाला लगेच कनेक्ट होतात. खानदेशी खाद्य पदार्थ, ते करण्याचा सोहोळा, वेगवेगळे सणवार, एकत्र बागडणारी भावंडं आणि घरातल्यांची मस्त interaction, ही सगळी भट्टी मस्त वाचनीय होती. त्यात तू भर घातलेली स्थल दर्शनं, घरातल्या स्पेशल गोष्टी, तुला भावलेल्या व्यक्ति, हा सगळा प्रवास तुझ्या बरोबर आम्हा वाचकांना पण करायला मिळाला हे आमचं भाग्यच. हे सगळ लिखाण तुझ्या प्रत्यक्ष अनुभवातून आलेले आहे, त्या मुळे ते अगदी जिवंत आणि रसरशीत झाल आहे. तुझा हा साहित्य प्रवास आता दोन वर्ष पूर्ण करतो आहे, त्या निमित्ताने तुला मनःपूर्वक शुभेछा देऊन तुझ्या पुढील लेखन प्रवासाला आशिर्वाद देऊन उत्कंठेने त्या प्रवासची वाट पाहत आहोत. तुला उत्तरोत्तर नवे नवे विषय सुचत जावेत आणी आम्हाला वाचनीय मेजवानी मिळत रहावी हीच ईच्छा.
💐
माझे जीवनगुरू



परत भेटूच पुढल्या भागात , या आनंदी सोहोळ्याच्या !
तसेच जगाच्या कान्याकोपऱ्यातून वाचक माझे हे लिखाण वाचत असतात . त्याच्याशी मी प्रत्यक्ष संपर्क करू शकत नाही . पण तुम्हा सगळ्यांकडूनच मला ऐकायला आवडेल ! तुम्ही खाली कंमेंट च्या स्वरूपात तुमची मत सांगू शकता किंवा वर "contact us" मधेही सांगू शकता ! 
तुम्हा सगळ्यांचीच वाट बघत आहे , तुमच्या अभिप्रायाच्या स्वरूपात ! अर्थातच प्रत्यक्ष भेटीची सुद्धा ओढ आहेच !


©आनंदी पाऊस 
आनंदी सोहोळा २
२५ ऑगस्ट २०२१















 



Comments

  1. खूप छान ����

    ReplyDelete
  2. Tuzi pratyek post khupch barik nirikshan keleli ani likhan ti ghatna dolyasamor ubhi karte , keep it up dear �� I am happy for your efforts ��

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे मनःपूर्वक सप्रेम धन्यवाद !🙏🤩🤩🤩

      Delete
  3. स्वाती प्रभुणेAugust 25, 2021 4:49 pm

    सर्वांनी प्रत्येकाने आपले मनोगत खूपच मस्त अप्रतिम मांडणी केली आहे मोरवचिकर सर मस्त अग खूप नवं नवीन माहिती मिळत गेली आणि आता हळूहळू खरंच अमेरिकन सौसंस्कृती जन्माला येऊ लागली आहे बरोबर का चूक सांगता येणार नाही कारण आपण काळा प्रमाणे पुढे जायलाच हवे

    ReplyDelete
    Replies
    1. शेवटचे वाक्य अगदी बरोबर आहे , मलाही तसेच वाटते . पण इतिहासाचा पाया भक्कम असेल तर पुढची इमारत जास्त भक्कम होते . मग इतिहास माहितीच हवा , फक्त तो योग्य पद्धतीने शिकविला , सांगितला जायला हवा आणि शिकला जायला हवा ! धन्यवाद !🙏😊

      Delete
  4. wachkanche abhipry lekh sunder
    He aanandi sohla lekhan aasech pudhe chalu rahu de
    Nav navin subject waril tuze sahaj sunder samrastene lihile lekh aamhala wachyla milu de
    Phulanche pics ����

    ReplyDelete
    Replies
    1. काकू खूप सारे धन्यवाद आणि खूप सारे प्रेम !!🤩😍😇🙏

      Delete
  5. जनार्दन चौधरीAugust 25, 2021 9:28 pm

    प्रतिक्रिया लेखनाचे कौतुक रसग्रहण आशिर्वादपर प्रकटन सर्वच वाचून डोळे पाणावले

    ReplyDelete
    Replies
    1. खरचं , माझ्या डोळ्यांच्या कडा सुद्धा ओलावलेल्याच आहेत , पहिला अभिप्राय आला तेव्हा पासून ..... किती तो प्रेमाचा पाऊस .... अगदी feeling blessed सारखे feeling येतेय मला . किंवा feeling blessed नक्की काय आहे ते कळतंय ! 😇😇😇

      Delete
  6. Chandrashekhar PachpandeAugust 25, 2021 9:33 pm

    खुप छान व्यक्त केलं आहे मनोगत साऱ्यांनी.
    तपशीलवार वर्णन, नेहमीचे प्रत्येकाने अनुभवलेले विषय हा तुमच्या लेखांचा गाभा आहे. वाचतांना सतत वाटतं असतं की अरे हा तर माझा देखील अनुभव आहे, आणि तिथेच वाचक लेखामधे गुंतत जातो.
    मला माझ्या बालपणातल्या बऱ्याचशा गोष्टी आठवतात असं मला नेहमी वाटतं पण तुमचे लेख वाचतांना काही आठवणी नव्याने प्रकाशात आल्या, नव्याने जगता आल्यात या साठी तुम्हाला खुप खुप धन्यवाद.

    लेखांमधल्या बऱ्याच गोष्टी माझ्या लक्षात आहेत पण लेख म्हटलं तर पटकन आठवतील अशा दोन म्हणजे बंब (तो फोटो मोबाईल मधे सेव्ह करून ठेवला आहे) आणि सांजरी चा उल्लेख.

    असेच खुप खुप लेख वाचायला मिळावे ही ईच्छा.
    पुढील लिखाणासाठी खुप खुप शुभेच्छा

    ReplyDelete
  7. ज्योतीAugust 26, 2021 11:17 am

    छानच सुरू आहे आनंदी सोहळा ......तुझे लेख आणि लिखाण याचे सर्वांना खूपच कौतुक आहे.. ❤️❤️..गुरूंनी लिहिलेले खूपच वेचक आणि वेधक आहे....प्रत्येकाने लिखाणाच पुरेपूर आस्वाद घेतलाय .....आजच्या या प्रसंगी असेच आनंद देणारे लिखाण तुझ्याकडून होवो ही सदिच्छा ��आणि तुझ्या कलाकृती ......ज्या तू अजून इतरांपर्यंत पोचवल्या नाहीत...त्याचा पण श्री गणेशा होवो��......तुला खूप सप्रेम शुभेच्छा...... ������

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप मनःपूर्वक स्नेहाळ धन्यवाद ! 😍😇😇

      Delete
  8. सगळ्यांनी तुझ्था लेखनाचा भरभरून आणि पुरेपुर आस्वाद घेतला आहे. तुझ्या लेखनातून अस्च भरभू रून वर्णन करून सर्वांना आनंद द्यावा अस तुला आशिर्वाद आणि शुभेच्छा. सौ.मंदा चौथरी.

    ReplyDelete
    Replies
    1. हे सगळे तू दिलेल्या अनुभवांमुळेच शक्य झाले ! खूप खूप खूप सारे प्रेम !!🤩😍😇🙌🙌🙌

      Delete
  9. अशीच लेखनारूपी आठवणीची बरसात होऊदे..आम्हांला वाचनाचा‌ आनंदमिळू दे... पुढील लेखन प्रवासासाठी शुभेच्छांचा वर्षाव...खुप कौतुक

    ReplyDelete
    Replies
    1. खूप साऱ्या धन्यवादांचा वर्षाव , तुझ्या प्रेम बद्दल आणि तू दिलेल्या खूप कल्पक आणि अद्वितीय अशा अभिप्रायांबद्दल !!!
      😇😇😍😍🙌🙌

      Delete
  10. जितेंद्र महाजनAugust 27, 2021 2:52 pm

    खूप छान सर्व लेख उत्तम खरोखर एखादा साहित्यिकाने लिहावे इतके छान��������

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक सप्रेम धन्यवाद 🙏 ☺ 😇

      Delete
  11. 🙏 ताई
    लेखनाचा उत्तरार्ध खूप छान झाला आणि वर्षभराची ही मेहनत खूप फुलांप्रमाणे सुगंध पसरवीत आहे असेच पुढील वर्षीही विचार पुष्प वाचायला मिळावे हीच ओढ आहे

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺ 😇

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...