Skip to main content

उन्हाळी फळं आणि आम्ही २ (घरातील गमती जमती)

उन्हाळी फळं आणि आम्ही-२
(घरातील गमती जमती)

                                                 आज या पैकी दुसऱ्या फळाची म्हणजे टरबुजाची (water melon )गोष्ट. टरबुजाच्या तर खरेदी करण्याच्याच खुप गमती जमती आहेत. आंतरजालात(internet) तर बरीच काय काय माहिती येते या बद्दल. पण मी कधी खरेदी करतच नाही टरबूज. फारच क्वचित खरेदी करते, तेव्हा एकच नियम लावते, अगदी लहान आकाराचे घ्यायचे. एकदा कापले की दोघात खाऊन संपले पाहीजे. पूर्वी आंतरजाल(internet) नसल्याने ते वाचून खरेदी करणेही शक्य नव्हते. आता काही वर्षांपासून मी हे चट्ट्यापट्टयाचे टरबूज बघतेय. पण आमच्या लहानपणी फक्त, बाहेरून गडद हिरव्या रंगाचे आणि आकाराला गोल गरगरीत असे टरबूज मिळत असतं. तर याची खरेदी करतांना, यावर बोटानी मारून आवाज कसा येतो यावर ठरते, ते कसे असेल. पण हा काही खात्रीलायक मार्ग नाही आणि सगळ्यांनाच त्यातले कळते असे नाही. अगदी पट्टीच्याच माणसाला ते कळते. मग हे आत छान लाल भडक आहे की नाही हे बघण्याकरिता दोन प्रकारे सरळ कापूनच बघितले जात असे. एक म्हणजे एक सरळ चीर पडायची, उभ्यात म्हणजे देठापासून चालू करून त्याच्या विरुद्ध टोकापर्यंत. त्यानंतर ते टरबूज दोन्ही हातात धरायचे अशा पद्धतीने की ती चीर वरच्या बाजूला हवी आणि दोन्ही हाताजवळ तीची दोन टोकं यायला हवीत. मग दोन्ही हातांनी दोन्ही बाजूने थोडा दाब द्यायचा, असे केल्याने ती चीर अजून थोडी रुंद होते आणि आतला गर नीट दिसतो आतपर्यंत. नीट बघायचे त्याचा रंग छान लाल भडक आहे की नाही ते. 
                                                दुसरी पद्धत म्हणजे टरबुजाच्या पृष्ठभागावर चौकोनी पण आत निमुळत्या होणाऱ्या चीर पडायच्या. मग हा चौकोन बोटांनी धरायचा आणि बाहेर काढायचा. तो बाहेर काढला की हा आकार उलट्या पिरॅमिड सारखा दिसतो. याचे जे आतले टोक असते ते म्हणजे टरबुजाचा मध्यबिंदू असतो. याला गड्डा काढणे म्हणतात. हा बघायचा, छान लाल भडक रंगाचा असला तर घेऊन टाकायच. आमच्याकडे साधारण यापैकी एका पद्धतीने बघून आणले जात असे टरबुज. आता या पद्धतीने बघून आणले म्हणजे एक गोष्ट ओघानेच येते. ती म्हणजे, ते टरबूज त्याच दिवशी कापुन खावे लागणार. कारण तेव्हा शीतकपाट नव्हते घरात. आता मात्र अशा पद्धतीने आणले तर शीतकपाटात ठेवून नंतर सुद्धा खाता येईल. पण टरबुज खुप वातुळ असते. कापुन जास्त वेळ ठेवुन, खाल्ले तर ते अजुनच वातुळ होते. त्यामुळे कापले की लगेचच खावे. आमचे आजोळचे बाबा(आजोबा) आयुर्वेदिक वैद्य होते. ते तर टरबुज घरात आणुच देत नसतं, वातुळ असते म्हणुन. 
                                             या सगळ्यात एक गंमतशीर गोष्ट! आमचा चिकन मधील आंबा आठवतो ना? तसचे आमच्या चिकन मध्ये काही काळ टरबुज सुद्धा होते. आता आंब्याचे झाड तर उंच, त्यावरील आंबे काढणे फार सोप्पे नव्हते . तरी चोरीला जात. आता टरबुज म्हणजे तर अगदी जमिनीवरच, चोरुन, तोडुन न्यायला फारच सोप्पे. त्यामुळे ते तर सर्रास सगळेच्या सगळे म्हणजे अगदी लहान, मोठे सगळे टरबुज चोरीला जातं. त्यामुळे आम्हालापण अगदी छोटी छोटी सुद्धा, जी काय हाती लागतील ती सगळी तोडुन आणावी लागत. शुगर बेबी जातीची होती ही टरबुजं. आता जी हाती लागेल, ती आणल्याने अर्थातच ती पुर्ण वाढ झालेली नसतं. त्यामुळे ती कापल्यावर लाल काय, गुलाबी सुद्धा निघत नसतं. तर चक्क पांढरी निघतं. बघुनच नको वाटे खायला. पण मोठी मंडळी खातं. खातांना नेहमी सांगत खूप गोड आहेत, पांढरी असली तरी. मग आम्ही सुद्धा खायला सुरुवात केली, खरचं फारच गोड लागत ती टरबुजं! त्यामुळे काही काळ आम्ही चक्क पांढरी असलेली टरबुजं सुद्धा खाल्लेली आहेत अगदी आवडीने!
                                                 तर हे टरबुज सुद्धा बाजारातून आणले की आधी पाण्यात ठेवले जात असे. तेव्हा तर ते तसेही फारच आवश्यक, कारण उन्हाळ्याच्या भर दुपारी आणलेले, त्यामुळे फारच गरम झालेले असे आणि दुसरे म्हणजे घरात शीतकपाट नव्हते. पण या सगळ्या करणाव्यतिरिक्त सुद्धा ते पाण्यात किमान अर्धा ते पाऊण तास तर बुडवून ठेवावे मगच खावे. आता हे टरबुज वरील पैकी कुठल्याही पद्धतीने कापुन आणलेले असले तरी, पाण्यात टाकतांना काळजी घ्यावी लागे. थोड्याच पाण्यात सावकाश ठेवावे लागे अन्यथा त्यात पाणी शिरण्याची शक्यता. परत त्याच्याशी खेळत बसून तर मुळीच चालणारे नसे कारण थोडे हलवले किंवा फिरवले तरी त्यात लगेच पाणी जाणार. काकडी सारखे हे टरबुज अर्धा पाऊण तास पाण्यातलगेच खा भिजले की यलाही मिळत नसे. 
                                                रात्री सगळी पुरुष मंडळी घरी येऊन त्यांची जेवण आटोपली की मग सगळे एकत्र बसत. मग मम्मी ते चिरत असे. आमच्याकडे एक विळा होता. हाच तो गच्चीवरील बागेसाठी वापरला जाणारा. या विळ्याने आधी त्याचे दोन भाग करत असे. मग पावशीने(विळीने) त्याच्या मोठ्ठ्या लांब लांब फोडी चिरून घेत असे. मग सुरीने किंवा पावशीनेच त्याची सालं काढून टाकत असे आणि छोटे छोटे तुकडे करत असे. त्यानंतर सुरीने त्यातील शक्य तितक्या सगळ्या बीया काढून टाकत असे. मग जीतके लोक घरात तितक्या ताटल्या घेऊन त्यात समप्रमाणात ते तुकडे घालत असे. तेव्हा आमच्याकडे फळं खाण्यासाठी काटे होते छोटे छोटे. स्टीलचे काटे आणि त्याला गुलाबी आणि निळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या मुठी असलेले. प्रत्येक ताटलीत एक एक काटा टोकाचयाचा एखाद्या फोडीला आणि एकेकाला द्यायची. त्यात सुद्धा नखरे, एक म्हणे मला गुलाबी काट्यावाली ताटली हवी आहे, तर दुसरी म्हणे मला निळ्या काट्यावाली ताटली हवी. मग सगळे छान गप्पागोष्टी करत, हसत खेळत खात असतं. 
                                                खाऊन झाले की, खाती सगळी साल एखाद्या ताटात किंवा घमेलीत ठेवली जात. अर्थातच दुसऱ्या दिवशी खाली गाईगुरे दिसली की त्यांना यला घातली जात. खातेवेळी ज्या बिया फोडीमध्ये राहुन जात, खाते वेळी काही जण खाऊन घेत तशाच आणि काहीजण काढून टाकत. मग आधी काढलेल्या आणि या सगळ्या बिया, आमच्या कडे असलेल्या एका पितळी चाळणीत टाकून ठेवल्या जात. तेव्हा  टरबुजाच्या बिया छान गडद काळ्या रंगाच्या असत आणि आकाराने एकदम टपोऱ्या. आता तसे नसते, आकारही छोटा आणि रंग ही विचित्रच असतो. आम्हाला त्या लगेच तेव्हाच धुवायच्या असत, पण अर्थातच याला परवानगी नव्हती. आम्हाला या बिया खायला सुद्धा खूपच आवडत, अजूनही आवडतात. दुसऱ्या दिवशी रविवारच त्यामुळे शाळेला दांडी. मग सकाळी आवरुन झाले की आम्ही त्या धुत असु स्वच्छ. या बिया धुवायला एकदम सोप्प्या. त्या गरामध्ये असल्याने चिकट असतात, तो चिकट पण एकदा किंवा फारतर दोनदा पाण्याने धुतल्या की निघून जातो. पण धुतांना जाम मज्जा येते. पाण्याने भरलेल्या बादलीत किंवा घमेलीत ती चाळणी बुडवायची. त्या चाळणीच्या प्रत्येक छिद्रातून पाणी चाळणीत येते , किती तरी धारा पाण्याच्या एकदम, त्यापण खालून वर येणाऱ्या! आनंदच आनंद! हा खेळ तर बराच वेळ चाले, मम्मीचा ओरडा खाऊन मगच संपत असे. 
                                             मग या धुतलेल्या बिया त्या चाळणीतच ठेवुन, गच्चीवर वाळण्यासाठी ठेवायच्या. उन्हाळा म्हटल्यावर त्या बऱ्यापैकी लवकर वाळत असतं. पण घाई करून चालत नाही, जी आम्हाला नेहमीच असे. पूर्ण कोरड्या टणटणीत वाळल्या असल्या, तरच त्या सोलायला थोडे सोयीचे होते. अर्धवट वाळल्या तर पट्टीच्या सोलणाऱ्याला सुद्धा सोलाणे मुश्किल होते, कारण या बिया सोलाणे म्हणजे सोप्पे काम नाही, फार कौशल्य लागते त्याला. तर काही तासात या बिया छान कोरड्या टणटणीत होत. त्या पूर्णपणे कोरड्या झालेल्या बियांची चाळणी खाली आणली, की मम्मी त्याचे समसमान वाटे करून देत असे, आमची भांडण होऊ नये म्हणुन. आज कालची पिढी म्हणेल, काय त्या बिया आणि त्यासाठीही भांडण!
                                           तर मग प्रत्येक जण आपापला वाटा घेऊन, आपापल्या मुड प्रमाणे सोलून खात असे. आता माझी नेमकी इथेच गोची होत असे. कारण कितीही कोरड्या टणटणीत वाळलेल्या बिया असल्या, तरी मला काही त्या सोलता येत नसतं तेव्हा. मग माझा वाटा घेऊन मी ताईच्या मागेमागे फिरणार , कारण ती एकदम पटाईत या बिया सोलण्यात! तिला सोलता येत असल्याने, ती तिला हवे तेव्हा खाऊ शकत असे. माझे तसे नव्हते. ती सोलून देईल तेव्हा खायला मिळत असतं. किंवा याला अजून एक मार्ग होता. ही बी सोलायची म्हणजे ही अंगठा आणि तर्जनीत धरायची, निमुळते टोक बाहेर आणि पसरट  भाग बोटाच्या चिमटीत पकडायचा. मग ती पुढच्या दातांमध्ये उभी धरुन, त्यावर हलकेच दाब द्यायचा. असे करतांना काळजी घ्यावी लागते, या बी ला जिभेचा स्पर्श होता कामा नये किंवा ही तोंडातील लाळेमुळे ओली होता कामा नये. तसे जर झाले तर संपलेच. पुन्हा ती बी पूर्ण कोरडी होईपर्यंत वाट बघावी लागते. कारण या बी ची साल बाहेरून एकदम बुळबुळीत होऊन जातात थोडाही ओलावा लागला तर, आणि ती बोटांतून सटकून जाते. परिणामी सोलताच येत नाही. तर त्या बी वर दाताने दाब दिल्यावर, या बीच्या सालाला एक टीच पडते. मग ती दोन्ही हातात धरून बोटाच्या नखांनी अजून मोठी करायची आणि दोन्ही सालं वेगळी करायची. आत त्याच आकाराची गुलबट पांढऱ्या रंगाची बी असते. ही झाली पूर्ण सोललेली बी! तर दुसरा मार्ग म्हणजे बी पूर्ण सोलुन न देता, बी फक्त टिचवुन द्यायची. पुढचे पूर्ण सोलण्याचे काम मी करायचे, जे बऱ्यापैकी सोपे असते.
                                      मग ती बाहेर आलेली बी खायची छान दुधाळ मधुर चव असते तिची. बी छोटीशी असली तरी छान सगळ्या तोंडात ती चव पसरते. कधी कधी सोलून मिळण्याइतका किंवा टिचवुन देण्याइतका धीर नसला आणि वैताग आलेला असला तर मात्र मी सालासकट बियांचा बोकणा भरुन खाऊन घेत असे. पण असे करतांना बीयांसोबत सालं सुद्धा चावल्याने, बीयांची ती मधुर चव थोडी मारली जात असे.
                                       आता मात्र अजिबातच खात नाही मी टरबुज आणि टरबुजाच्या बीया सुद्धा. ते वातुळ असते आणि इथल्या थंड हवामानात कधीतरी वाताचा त्रास होतो. पण मधल्या काळात एका मित्रानी टरबुजाचा रस प्यायची आवड माझ्यात विकसीत केली. मग हा रस पीते मी, बऱ्याचवेळा. साधारणपणे शनिवारी, रविवारी बरीच काम असतात, जेवायला उशीर होतो. अशावेळी ताजे ताजे कापुन, त्याचा रस काढते आणि मोठ्ठा ग्लास भरून पिऊन घेते. पोटाला चांगला आधार होतो . खाली दिलाय माझा टरबुजाच्या रसाचा मोठ्ठा ग्लास! किंवा बाहेर खाणे झाले तर त्यावर हा रस प्यायला की पित्त होत नाही असे लक्षात आले, तेव्हापासून बाहेर खाल्ल्यावर सुद्धा हा रस पिते, अगदी आवडीने. आणि बिया तर हल्ली फारच बारीक बारीक निघतात, छान काळ्याभोर सुद्धा नसतात रंगाला. मग त्या खव्याश्या सुद्धा वाटत नाही. कधीतरी छान बीया निघाल्या तर मात्र नक्की खाते आणि गम्मत म्हणजे आता अगदी छान सोलता येतात! 

©आनंदी पाऊस 
(घरातील गमती जमती)
९ जुन २०२०


हल्ली बाजारात मिळणारे टरबुज 


हल्ली बाजारात मिळणारे टरबुज 


हल्ली बाजारात मिळणारे टरबुज 


हल्ली बाजारात मिळणारे टरबुज 


हल्ली बाजारात मिळणारे टरबुज 




आम्ही लहान असतांना फक्त असे एकदम 
गडद हिरव्या किंवा काळ्या रंगाचे आणि 
एकदम गोल गरगरीत टरबुज मिळतं 


टरबुजाच्या फोडी






हे आमचे फळं खायचे काटे 
अजून आहेत !


टरबुजाच्या काळ्याभोर बीया 
आणि सोललेल्या बीया 


हाच तो माझा मोठ्ठा ग्लास 
टरबुजाचा रस प्यायचा !😍😍😍


टरबुजाच्या बीया खाल्ल्याने होणारे फायदे 











Comments

  1. खूप छान लिखाण केले आहे.
    धन्यवाद

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺

      Delete
  2. स्वाती प्रभुणेJune 26, 2020 1:15 pm

    मस्त झाला आहे लेख टरबूज वातूळ असते हे माहीत नव्हते आमच्या कडे मोठे टरबूज प्रत्येकी 1 लागते मस्त उन्हाळ्यात रोज खातो लाल फळ डोळे वबुद्धी ला चांगले व पाणी प्रमाण जास्त अशी माहिती होती अजूनही पुण्यात हिरवी गार मिळतात व रेषा वाली पनवेल ची टरबूज म्हणतात इथे सोललेल्या बिया मिळतात आम्ही कापून आणत नाही

    ReplyDelete
    Replies
    1. बापरे! प्रत्येकी एक!!! 😳
      बाकी टरबुजाची माहिती छान, माझ्या माहितीत
      बरीच भर पडली!
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺

      Delete
  3. सुंदर लेख. मी तशी फारशी फळांच्या वाटेला जात नाही. पण हे कलिंगड (आमच्याकडे याला कलिंगड म्हणतात) मात्र खास आवडीचे. उन्हाळ्यात जो पर्यंत बाजारात मिळतो पर्यंत आवर्जून खातेच.

    ReplyDelete
    Replies
    1. अरे फारच आचार्य वाटले, तू फळांच्या वाटेला जात नाही हे वाचुन. पण का असे?
      तुला असेच भरपूर कलिंगड मिळत राहो 😍😇

      Delete
  4. Kate pahun aathvle te, Mala khup aavdayche. Chan lekh lihila aahes.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी खरंय, ते काटे सगळ्यांचे अगदी आवडते!
      मला तर एकदम भरून आले, ते काटे ईतक्या वर्षानी बघितल्यावर.... 😍 ❤️

      Delete
  5. छान लेख. मला स्वत:ला टरबूज आवडते. उन्हाळ्यात कूलंट म्हणून व पाणीदार म्हणून अतिशय उपयुक्त असते. वातूळ असते हे माहित नव्हते. आणल्याबरोबर स्वच्छ धुवून ठेवले की सवडीने कापून ठेवतां येते. थोडावेळ जर शीतकपाटांत (��) ठेवले तर अजूनच बहार येते. बाजारातून कापून आणत नाही, कारण आजकालच्या बहुतेक सगळ्या जाती गोडच असतात. ( माॅडीफाईड बियाणे). बिया मात्र कधीच खाल्ल्या नाहीत. आपल्याकडे गडद हिरवेच मिळायचे. नवीन रेषांवाले बहुधा कर्नाटकात पिकवतात. आजकाल बारमाही पीक येते टरबूजांचे, त्यामुळे उन्हाळ्याची ‘तशी’ उत्सुकता नसते.
    तुझे वर्णन टरबूज/कलींगडाएव्हढेच रसाळ होते.

    ReplyDelete
    Replies
    1. Modified नाही hybrid....
      एकंदरीत सगळ्यानाच टरबूज फार आवडते.
      तुझ्या या रसाळ अभिप्राय बद्दल खुप सारे धन्यवाद 😍 😇 😜

      Delete
  6. जितेंद्र महाजनJune 26, 2020 5:14 pm

    उन्हाळी फळ आणि आम्ही खूप छान एक नवीन शब्द वाचण्यात आला शीत कपाट आपला मराठी खरोखर छान आहे शीत कपाट ... हा शब्द खूप भावला

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺

      Delete
  7. Khupach chan lekh lihilas tai .....Kalingad varnan sahi keley

    ReplyDelete
    Replies
    1. खुप सारे प्रेम गौरी 😍❤️

      Delete
  8. Khupach chan lekh lihilas tai .....Kalingad varnan sahi keley

    ReplyDelete
  9. Khoopach chan varnan fakt vishai tarbuj ani ya vishaivar yevhade morhe likhan omg
    Shikaayat, biya kasha solaiche varnan, biyacha bakana ��

    ReplyDelete
    Replies
    1. अरे तू आता एकदा या बियांचा बोकणा भरून बघच आणि सांग मला, कसे वाटले ते 😍😇

      Delete
  10. khup mast.. ya unhalyat anhi khup khaalli kalingade.. amchyakade yala kalingad mhantat.

    ReplyDelete
    Replies
    1. अणि आम्ही या मौसमात एकही खाल्ले नाही टरबूज 😁

      Delete
  11. lahanpani matra pariksha sampalyavarach ghari kalingad yayche..
    mala ajunhi ras kadhanyapeksha fodi khaylach avadate.. unhalyatala mottha, bharpur ani rasdar anand mhanje garegar kalingad.

    ReplyDelete
    Replies
    1. हो आपल्या लहानपणी अशा बर्‍याच गोष्टी होत्या, परीक्षेनंतरच मिळणार्‍या त्यामुळे परीक्षा संपायची फारच घाई असे मला तर 😜😁.
      तुला कायम हा रसदार आनंद भरपुर मिळत राहो 😍😇

      Delete
  12. Khup chhan lekh. Lahanpanichya aathawani jagrut kelyaa

    ReplyDelete
    Replies
    1. आठवणीचा मोठ्ठा समुद्रच आहे आपल्याकडे !
      मस्त डुंबता येते, पाहिजे तेव्हा अणि पाहिजे तितका वेळ!!! 😍😇💃💃💃

      Delete
  13. Kishori matekarJune 27, 2020 1:04 pm

    Watermelon....
    I will give seeds 2 u
    U r recollecting yr golden memories

    ReplyDelete
    Replies
    1. अरे वावा, तूच माझी खरी मैत्रीण! ❤
      आतुरतेने वाट पाहत आहे..... 😍 बियांची...

      Delete
  14. TARBUJANCHYA BIYANCHE KHANYACHE VARNAN VACHUN TONDALA PANI SUTALE AANI TYACHI BEE DATATUN JEVHA SUTATE TEVHACHI AAPLA AALELA RAG AATHAUN AATA MATRA KHUP HASU AALE MAJA AALI JUNYA AATHAVANI JAGYA ZALYA

    ReplyDelete
    Replies
    1. खरच टरबूज खाण्या पेक्षा, त्याच्या बिया खाण्याचाच आनंद जास्त होता! 😍
      अणि बी दातातून सुटली की खरच खुपच राग येत असे, अगदी नीट आठवते आहे हे 😜😁😂

      Delete
  15. अगदी बरोबर एक तर ती बी दाता खाली घेतली की तोंडाला पाणी सुटायचे आणी बी सुटली की बोटे दाता खाली यायची मग संताप अजून वाढायचा चांगलं आठवतय 😊😊

    ReplyDelete
  16. Mala mahit nawhte tarbuj watul asate he..aamchya dnyanat Bhar padali..aani farach chhan rasal lekh..

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺ 😇

      Delete
  17. चिकन मधील आंबे��..हे नॉनव्हेज आंबे खूपच चटकदार होते..आमचे बाबा होते तोपर्यंत खूप मज्जा होती ती आंबे खाण्याची.

    ReplyDelete
    Replies
    1. चिकन मधील आंब्यांना तोड नाही, जगातील सगळ्यात चटकदार आंबे!! अणि ते आंबे खायला मिळणारे सगळ्यात नशीबवान!!! ❤ 😇

      Delete
  18. Wa chan tuza lekh vachun tarbuj n khanara pan khayla lagel etka rasrasit lekh aahe pandhre tarbuj vachunch kalale pahile nahi mi pan

    ReplyDelete
    Replies
    1. अरे वावा!! फारच छान पावती दिलीस माझ्या लिखाणाला!! खुप सारे प्रेमपूर्वक धन्यवाद 🙏 ☺ 😇 😍

      Delete
  19. खूप छान वर्णन केले आहे ताई

    ReplyDelete
    Replies
    1. सप्रेम धन्यवाद 🙏?
      कोण आपण?

      Delete
  20. This article is so much juicy....like watermelon....it is really so much fun to eat 🍉 watermelon in summer season...very informative and descriptive article....

    ReplyDelete
  21. छान लेख तापी व वाघूर नदी काठच्या टरबूजाची चव अजून आठवते त्या वेळी टरबुजाच्या बिया सुरत भुसावळ लाईनवर ट्रेन मध्ये विकत मिळायच्या 5 रु ला छोटे मापटे साधारण 2 कप एवढे माप असायचे
    ती सिंगल लाइन असल्याने पॅसेंजर ट्रेन बऱ्याच ठिकाणी थांबत जायची व इतर सर्व ट्रेन आधी जायच्या या बिया खाणे एक चांगला टाइम पास होता
    गंगाफळाच्या बिया पण मिळायच्या त्या पण खूप पौष्टीक असतात

    ReplyDelete
    Replies
    1. नदी काठाच्या अणि नदीच्या पात्रातील सुद्धा!!
      आगगाडीत बिया मिळत हे फारच नवीन आहे माझ्या साठी! छान माहिती मिळाली ही बिया बद्दल ची! हो अणि गंगा फळाच्या बिया सुद्धा छान लागतात अणि पौष्टिक सुद्धा!! आम्ही त्याही खातो अधुन मधुन, कालच धुवुन ठेवल्या आहेत त्या!
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺ 😇

      Delete
  22. Sanjita ShrikantJune 28, 2020 7:54 pm

    Abhipray- लेख वाचताना feeling coolness and sensing taste of ��, the
    Didn't see ever yellow and squarish��.
    Waterish coolish �� used to have with seeds with thin चकती.
    Used to have��eating start from middle part of चकती.
    I like muskmelon too अबोली color rare color fruit in nature.

    ReplyDelete
    Replies
    1. As usual very unique reply, I actually could c u eating starting from middle part of the चकती!
      Yeah u will get to read about muskmelon too very soon!

      Delete
  23. Nanada wagle hy vershali kalingad lekh madhil barik barik varnan khoop sunder bajaratun kalingad aanle ki kkaple lalbhadak rang anand dei biya sukle ki datani haluwar solun khanechi gammatch wegli pics sunder phle tochun khaneche kate hi sunder tuze balpaniche lahan sahan gammti jammti wachun mi hi aashch anubhavatun geliyacha anand milto chan chalu rahu de likhan madt

    ReplyDelete
    Replies
    1. नमस्कार काकु, सगळ्यांना भरभरून आनंद मिळावा अणि आपले बालपणातील काही क्षण परत अनुभवता यावे, हीच माझी मनापासून इच्छा आहे 😊! तुमचा अभिप्राय वाचून कायम हा आनंद मी देवु शकत आहे असे वाटते!!
      खुप सारे प्रेमळ धन्यवाद 🙏 😍

      Delete
  24. खुपच छान लेख आहे पण तु अजून एक गोष्ट विसरत आहे आपण टरबूज थंड होण्यासाठी म्हणून टरबूज कापून ताटात ठेवून त्यावर ओला रूमाल त्या वरघालून ठेवत

    ReplyDelete
    Replies
    1. अरे खरच की, मी तर हे विसरूनच गेले! U r simply great! Thnk you so much, आठवण करून दिल्याबद्दल !
      आभाळभर सप्रेम धन्यवाद 😍 😇

      Delete
  25. कलिंगड. हा खाण्या पुरता मर्यादीत विषय इतका विस्तृत असू शकतो याची जाणीव नव्हती��. एकंदरीत छान लिखाण केल आहे...��

    ReplyDelete
    Replies
    1. प्रथमेश , तुला इकडे भेटून खूप आनंद झाला . तुझे मनःपूर्वक स्वागत आणि धन्यवाद !

      Delete
  26. खुप च छान माहिती टरबुजाची वातूळ असते हे पहिल्यांदाच ऐकलं नवीन माहिती मिळाली. टरबुजावर डिझाईन मस्त काढलेली खूप छान बघून असं वाटलं की लगेच आपल्याला खायला मिळते कि काय लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. बिया खाण्यासाठी खूप भांडणं व्हायची आमचे पण जो स्वच्छ करेल तोच घेईल टरबूज आणि खरबूज ची जोडी एक दिवस टरबूज आणायचे दुसऱ्याशी खरबूज आणायचे त्याला कोणी गुळभेली पण म्हणतात वरून पांढरे असते. दोघांची चव अगदी वेगळी वेगळी.


    ReplyDelete
    Replies
    1. ही माहिती बऱ्याच लोकांना माहिती नसते , असो . ,मनःपूर्वक धन्यवाद !

      Delete
  27. Akdom mast
    Mi aata pan watermelon�� cha biya khate
    N market madhun sol lely biya pan aanto aamhi

    ReplyDelete
    Replies
    1. वावा मस्तच ! आपण लहानपणी खूपच धमाल केलीय ! 

      Delete
  28. विकास पाटीलMay 18, 2021 9:14 am

    आज वाचलं!!!

    खूपच छान सराईत आहे तुमची लेखणी !

    मला पण बालपणात घेऊन गेला हा लेख!!

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद !

      Delete
  29. Dipali WaghuldeMay 18, 2021 10:13 pm

    मस्त गार गार वाटले टरबूज बदल वाचून. खूप छान लिहिलय����

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद !

      Delete
  30. छान लेख. टरबूज अगदी आवडतं फळ. फोडी करून फ्रिज मधे ठेवायचं आणि रात्री जेवण झाल्यावर खायचं हा शिरस्ता, थोडी साखर पेरायची अजून सुंदर लागतं. बाकी टरबूज वाजवून विक्रेता ते पारखून देतो ही अंधश्रद्धा असल्याचं मत आहे माझं. Reject केलेली टरबूज सुध्दा विकली जातातच की

    ReplyDelete
  31. गुलाबराव पाथरकरMarch 29, 2024 2:10 pm

    ऊन्हाळी फळे अवश्य खावीत परंतु आजच्या पिढीला कलिन्गड आणि टरबूज तसेच काकडी व खीरे यातला फरक कळत नाही ही खरेच गमतीदार गोष्ट आहे .

    ReplyDelete
  32. प्रफुल्ल पाटीलMarch 29, 2024 2:11 pm

    खूप सुंदर
    कलिंगड
    आमच्या वेळी मोर नदीकाठावरील कलिंगडे सर्व जणांना खूप आवडायचे.
    काही तर छोट्या माठा प्रमाणे गरगरीत असायची.🍉🍉🍉🍉🍉🍉🍉

    ReplyDelete
  33. भाग्यश्रीMarch 29, 2024 2:12 pm

    टरबूज आख्यान फळाप्रमाणेच रसाळ!
    आंबा उन्हाळ्याचा राजा तर टरबूज या राजाचा बाप आहे असं मला वाटतं. कारण सर्वांना परवडतं. भरपूर मोठं असल्याने पूर्ण कुटुंब खाऊ शकतं. मुख्य म्हणजे प्रत्येक भागाचा खाण्यासाठी वापर होतो. सालींची भाजी करतात. पांढऱ्या गरामधे रवा आणि आवडीनुसार जिन्नस घालून आप्पे किंवा धिरडे/घावन करतात. बियांचा वापर मिठाई आणि आइस्क्रीममधे होतो.
    तुमच्या लेखनात भेटणारं एकत्र, मोठं कुटुंब हीच मोठी खास, आकर्षक गोष्ट आहे. आणि हो, सध्या अत्यंत दुर्मिळ असल्याने एकदमच आश्चर्यकारक!

    ReplyDelete
  34. आहाहा.. गारवात्मक लेख आहे...सगळंच कसं डोळ्यासमोर visualise झालंय...आम्ही कलिंगड म्हणतो..(कलिंगडावरील जोक आठवला भेटल्यावर ऐकण्यात मजा आहे ).
    सारे प्र.चि. coolness देणारे टिपलेस.
    माला तर miniature होऊन कलिंगडाच्या लाल थंडगार गरा मध्ये मनसोक्त पोहत राहावंसं वाटतंय आणी बीयांवर उभारून
    surfing 🌊 करावसं वाटतंय...
    मी काय करू ....सनविवी संजिता

    ReplyDelete
  35. खूप छान लेख आहे.टरबुजाचे वर्णन अप्रतिम आहे.पिवळ्या रंगाचे टरबूज असते. मी पहिल्यांदा पाहिले.ते वातूळ आहे या विषयी माहीत नव्हते.खूप छान लिहिले आहे वर्षा.

    ReplyDelete
  36. भारती फेगडेApril 07, 2024 1:15 pm

    ताई हा आनंद माझे माहेरी नदी असल्याने लग्न होईपर्यंत खूप लूटला.किलोने नाही तर टोपले टोपले ही फळे बाबा आणायचे.हे खाण्यासाठी उन्हाळ्यात पाहुण्यांचे आगमन सतत असायचे.आता ती गोडी नाही.तुमच्या लिखाणाने ते दिवस आठवलेत.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...